#क्राईम_किस्से : Nepalese Royal Massacre | नेपाळच्या शाही राजघराण्यातील 2001 चे हत्याकांड, राजा-राणीसह 9 कुटुंबीयांची हत्या करुन युवराजाची आत्महत्या

| Updated on: Aug 28, 2021 | 7:21 AM

1 जून 2001 रोजी युवराज दीपेंद्र यांनी नेपाळी राजघराण्याचे शाही निवासस्थान असलेल्या नारायणहिटी पॅलेसमध्ये आयोजित पार्टीवर अंदाधुंद गोळीबार केला होता. स्वत:च्या डोक्यात गोळी मारण्यापूर्वी त्यांनी आपले वडील राजा बिरेंद्र, आई राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातील इतर सात सदस्यांना - धाकटा भाऊ आणि बहीण यांनाही संपवले होते

#क्राईम_किस्से : Nepalese Royal Massacre | नेपाळच्या शाही राजघराण्यातील 2001 चे हत्याकांड, राजा-राणीसह 9 कुटुंबीयांची हत्या करुन युवराजाची आत्महत्या
हत्याकांडाच्या अकरा वर्षांपूर्वीचा (1990) नेपाळचे राजे बिरेंद्र, राणी ऐश्वर्या, मोठे पुत्र दीपेंद्र, धाकटे पुत्र निरंजन आणि कन्या श्रुती यांचा फोटो
Follow us on

मुंबई : नेपाळी राजघराण्याचे तत्कालीन निवासस्थान नारायणहिटी पॅलेस येथे 1 जून 2001 रोजी शाही हत्याकांड (The Nepalese Royal Massacre) घडले. राजघराण्यातील सदस्य राजवाड्यात एकत्र जमले असताना झालेल्या सामूहिक गोळीबारात राजा बिरेंद्र (King Birendra) आणि राणी ऐश्वर्यासह  (Queen Aishwarya) राजघराण्यातील नऊ सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी पथकाच्या तपासानुसार क्राऊन प्रिन्स (युवराज) दीपेंद्र (Crown Prince Dipendra) यांना हत्याकांडासाठी दोषी ठरवण्यात आले. हत्याकांडानंतर स्वतःवर गोळी झाडलेले दीपेंद्र कोमात गेले होते. राजा बिरेंद्र यांच्या मृत्यूनंतर कोमामध्ये असलेल्या दीपेंद्र यांना नेपाळचा राजा घोषित करण्यात आले होते. मात्र हत्याकांडाच्या तीन दिवसांनंतर शुद्धीवर न येताच दीपेंद्र यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर बिरेंद्र यांचे भाऊ ज्ञानेंद्र राजे झाले.

प्रत्यक्षदर्शींची माहिती, तसेच मुख्य न्यायमूर्ती केशव प्रसाद उपाध्याय आणि तारानाथ राणाभट यांच्या दोन सदस्यीय समितीने केलेल्या अधिकृत तपासणीनुसार काही निष्कर्ष काढण्यात आले होते.

त्या दिवशी काय घडलं?

1 जून 2001 रोजी युवराज दीपेंद्र यांनी नेपाळी राजघराण्याचे शाही निवासस्थान असलेल्या नारायणहिटी पॅलेसमध्ये आयोजित पार्टीवर अंदाधुंद गोळीबार केला होता. स्वत:च्या डोक्यात गोळी मारण्यापूर्वी त्यांनी आपले वडील राजा बिरेंद्र, आई राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातील इतर सात सदस्यांना – ज्यात त्यांचा धाकटा भाऊ आणि बहीण यांचाही समावेश होता – गोळ्या घालून ठार केले. बिरेंद्र यांचे बहुतांश उत्तराधिकारी मारले गेल्यामुळे, कोमात असतानाही युवराज दीपेंद्र राजे घोषित झाले होते.

कोणाकोणाची हत्या?

राजा बिरेंद्र
राणी ऐश्वर्या
युवराज दीपेंद्र
युवराज निरंजन (राजा बिरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांचा धाकटा पुत्र)
युवराज्ञी श्रुती (राजा बिरेंद्र आणि राणी ऐश्वर्या यांची कन्या)
युवराज धीरेंद्र (राजा बिरेंद्र यांचा धाकटा भाऊ, ज्याने आपल्या पदवीचा त्याग केला होता)
युवराज्ञी शांती (राजा बिरेंद्र यांची मोठी बहीण, बजहंगची राणी)
युवराज्ञी शारदा (राजा बिरेंद्र यांची मधली बहीण)
कुमार खड्ग (युवराज्ञी शारदा यांचे पती)
युवराज्ञी जयंती (राजा बिरेंद्र यांची चुलत बहीण)

कोणकोण जखमी?

युवराज्ञी शोवा (राजा बिरेंद्र यांची बहीण)
कुमार गोरख (युवराज्ञी श्रुती यांचे पती, राजा बिरेंद्र यांचे जावई)
युवराज्ञी कोमल (बिरेंद्र यांचे बंधू ज्ञानेंद्र यांची पत्नी, जी भविष्यात नेपाळची शेवटची राणी ठरली)
केतकी चेस्टर (युवराज्ञी जयंती यांची सख्खी, तर राजा बिरेंद्र यांची चुलत बहीण, तिनेही आपल्या पदवीचा त्याग केला होता)

हत्याकांडामागे विविध सिद्धांत

सामूहिक हत्याकांड करण्यामागील दीपेंद्र यांचा हेतू स्पष्ट झाला नाही, त्यामुळे त्यामागे विविध सिद्धांत मांडले गेले. दीपेंद्र यांना देवयानी राणा हिच्याशी लग्न करायचे होते, दोघांची युनायटेड किंगडममध्ये भेट झाली होती. मात्र तिच्या आईचे कुटुंब भारतातील निम्न दर्जाचे शाही कुटुंब होते, आणि तिच्या वडिलांच्या राजकीय संबंधांमुळे, नेपाळच्या शाही राजघराण्याने या नात्याला आक्षेप घेतल्याचा आरोप झाला होता.

खरं तर, देवयानी राणाचे ग्वाल्हेर कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत माजी राजघराण्यांपैकी एक होते. जे नेपाळी सम्राटांपेक्षा खूप श्रीमंत असल्याचे बोलले जाई. उलटपक्षी देवयानीच्या आईने आपल्या मुलीला इशारा दिला की नेपाळी राजकुमाराशी लग्न केल्याने तिच्या राहणीमानात घट होऊ शकते. राजघराण्याने निवडलेली दीपेंद्रची भावी वधू ही नेपाळी राणा कुळातील होती.

आणखी एका सिद्धांतानुसार, दीपेंद्र यांचे देवयानीशी लग्न झाल्यास भारतीय प्रभाव वाढण्याची शक्यता जास्त होती, ज्याला राजवाड्याने आक्षेप घेतला होता. आणखी एका दाव्यानुसार, देश निरपेक्षतेपासून संवैधानिक राजशाहीकडे गेल्यामुळे दीपेंद्र नाखूष होते.

अनेक प्रश्न अनुत्तरित

हत्याकांडाच्या वेळी राजघराण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, राजे बिरेंद्र यांचे बंधू ज्ञानेंद्र (जे नंतर राजे घोषित झाले) पोखरा दौऱ्यावर असल्याने यांची अनुपस्थिती, त्यांच्या कुटुंबातील कोणालाही न झालेली गंभीर दुखापत (पत्नी युवराज्ञी कोमल, पुत्र युवराज पारस आणि कन्या युवराज्ञी प्रेरणा) यामुळे ज्ञानेंद्रही संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते.

डावखुरा नसतानाही दीपेंद्र यांनी स्वतःवर झाडलेली गोळी उजव्याऐवजी डाव्या बाजूला कशी लागली होती, स्कॉटलंड यार्डने फॉरेन्सिक तपासासाठी सहकार्याची तयारी दर्शवली असतानाही दोन आठवड्यात तपास कसा आटपला, असे अनेक प्रश्न नंतर उपस्थित झाले होते. युवराज दीपेंद्र आणि निरंजन यांच्यानंतरच ज्ञानेंद्र यांची राजगादीवर वर्णी लागणार होती, त्यामुळे दोघांनाही मार्गातून हटवण्यासाठी त्यांनीच कट रचल्याचाही आरोप झाला. मात्र नेपाळच्या शाही राजघराण्यातील सामूहिक हत्याकांडाची पानं कुठल्याही ठोस कारणाविनाच उलटली गेली.

संबंधित बातम्या :

आई-वडील, पत्नी-मुलांसह घरातील 14 जणांची हत्या, तरुणाचा गळफास, ठाण्यातील हत्याकांडातून एकमेव महिला बचावलेली

Divya Bharti | पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अभिनेत्री दिव्या भारतीचा अखेरचा दिवस कसा होता?