काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, भाजीने भरलेली पिकअप 35 फूट खोल दरीत कोसळली; नाशिक-मुंबई महामार्गावरली घटना

| Updated on: Oct 06, 2021 | 10:47 AM

नाशिक-मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. यात नाशिकहून मुंबईला भाजी घेऊन जाणारी पिकअप व्हॅन तब्बल 35 फूट खोल दरीत कोसळली असून, वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, भाजीने भरलेली पिकअप 35 फूट खोल दरीत कोसळली; नाशिक-मुंबई महामार्गावरली घटना
संग्रहित छायाचित्र
Follow us on

नाशिकः नाशिक-मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. यात नाशिकहून मुंबईला भाजी घेऊन जाणारी पिकअप व्हॅन तब्बल 35 फूट खोल दरीत कोसळली असून, वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातून मायानगरी मुंबईला बहुतांश भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी भल्या पहाटेपासून ट्रक, पिकअप व्हॅन आणि इतर वाहने मुंबईला रवाना होतात. अशीच एक भाजीने भरलेली पिकअप व्हॅन बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पाडळीजवळ पोहचली. यावेळी वाहनचालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे पिकअप थेट पस्तीत फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचे नाव समजू शकले नाही.

अपघात वाढले

दरम्यान, गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात अपघात वाढले आहेत. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. रानवड शिवारात हे दोन वेगवेगळे अपघात झाले असून, दोन्ही घटनेत चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना उडवले आहे. या घटनेत मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) आणि संदीप शिवराम रसाळ (वय 32, रा. आहेरगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकला दिली मागून धडक

चांदवडहून धुळ्याला जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मालेगाव – धुळे रस्त्यावर मध्यरात्री एक वाजता अपघाती मृत्यू झाला. मालेगाव धुळे रस्त्यावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर काही दिवसांपूर्वी हा अपघात घडला. दुचाकीस्वाराने चालत्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यात गंभीर मार लागल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीस्वारांचे अपघात सत्र

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांना केंद्रावर नेत त्यांचे समुपदेशन करण्याची मोहीम सुरू केली आहे. या उपदेशाच्या डोसानंतर त्यांना एक प्रमाणपत्रही दिले जात आहे.

इतर बातम्याः

नाशिक विभागातील 2 हजार 63 तलाठी कार्यालयांची होणार झाडाझडती

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या चांदवडच्या रेणुका मातेचा यात्रोत्सव रद्द

आदिशक्तीचा जागर साधेपणाने; नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया नाही!