सांगली, विरारनंतर आता कल्याण-डोंबिवलीत मुलं चोरणारी टोळी आल्याची अफवा, पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

| Updated on: Sep 22, 2022 | 9:54 PM

मुले चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचा कल्याण डोंबिवलीत सोशल मिडियावर एक मॅसेज व्हायरल केला जात आहे. अनेक लोकांनी हा मॅसेज स्टेटसला ठेवल्याचे दिसून येत आहे.

सांगली, विरारनंतर आता कल्याण-डोंबिवलीत मुलं चोरणारी टोळी आल्याची अफवा, पोलिसांनी केले हे आवाहन
टिटवाळ्यात महिलेला मारहाण
Image Credit source: tv9
Follow us on

कल्याण / सुनील जाधव (प्रतिनिधी) : सांगली, विरारनंतर आता कल्याण-डोंबिवलीत मुलं चोरणारी टोळी (Child Stealing Gang) सक्रिय झाल्याची अफवा पसरली आहे. या अफवेमुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लहान मुलांचे अपहरण (Kidnapping) करणारी टोळी कल्याणमध्ये सक्रीय झाली आहे, असा खोटा मेसेज (Fake Message) सोशल मीडियावर पसरवण्यात आला आहे. याप्रकरणी कल्याण झोन 3 पोलीस सक्रिय झाली असून अफवा पसरविणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.

सोशल मीडियावर फेक मेसेज व्हायरल

मुले चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचा कल्याण डोंबिवलीत सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल केला जात आहे. अनेक लोकांनी हा मेसेज स्टेटसला ठेवल्याचे दिसून येत आहे. वास्तवात असे काही नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

क्लासजवळ काही लोकं मुलं पळवून नेत असल्याचा मॅसेज व्हायरल

आज एका क्लासेसजवळ काही लोक मुलांना पळवून नेत असल्याचे दिसून आले. पण तिथल्या स्टाफच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. आपल्या सर्वाना विनंती आहे की, आपल्या मुलांकडे बारीक लक्ष ठेवा असा मेसेज प्रत्येक मोबाईलवर दिसून येत आहे. ही अफवा एका चुकीच्या कथेमुळे पसरली.

हे सुद्धा वाचा

सहावीतील एका विद्यार्थिनीने घरी कथित कहाणी सांगितली

कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील एका शाळेतील सहावीच्या वर्गातील लहान मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितले की, एक महिला जिच्या तोंडावर काळा रंगाचा मास्क होता. ती माझ्या जवळ आली. त्या महिलेसोबत एका काळ्या रंगाची कारही होती.

आई-वडिलांनी शाळेला याबाबत माहिती दिल्यानंतर वाऱ्यासारखी पसरली बातमी

आई वडिलांनी मुलीकडून ऐकलेली कथा शाळेच्या शिक्षकांना सांगितली. त्यानंतर हळूहळू ही कथा शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हा मेसेज फेक असल्याची पोलिसांकडून शहानिशा

पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहता कल्याण झोन 3 पोलिसांनी सोशल मीडियावरील या मॅसेजची शहानिशा केली असता हा मॅसेज फेक असून असा काही प्रकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे पोलिसांचे आवाहन

ही केवळ अफवा असल्याचे उघड झाले असता कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन केले आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या नागरिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.