अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटला, चार कामगार जागीच ठार; छत्रपती संभाजीनगरावर शोककळा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर घाटात भीषण अपघात झाला. उसाने भरलेला ट्रक पलटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर तेरा जण जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटला, चार कामगार जागीच ठार; छत्रपती संभाजीनगरावर शोककळा
उसाचा लोड अंगावर आला, चौघांचा मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 10, 2025 | 1:52 PM

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. अख्खा उसाचा ट्रक अंगावर पलटल्याने उसाखाली दबून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर घाटात हा भीषण अपघात झाला. त्यामुळे संपूर्ण संभाजीनगरवर शोककळा पसरली आहे. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

कन्नड पिशोर घाटात हा अपघात झाला. मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. उसाने भरलेल्या या ट्रकमधून एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते. पण घाटात ट्रक येताच अचानक पलटी झाला. त्यामुळे अख्खा उसाचा लोड चार कामगारांच्या अंगावर आला. त्यामुळे हे कामगार जागीच ठार झाले. तर 13 मजुरांचे थोडक्यात प्राण वाचले.

रडारड ऐकून धावले

अपघात झाल्यानंतर मजुरांनी एकच आरडाओरड सुरू केली. परिसरात रडारड सुरू झाली. रडारडीचा आवाज ऐकून गावातील लोक घाटात धावतपळत गेले आणि त्यांनी मजुरांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारामुळे डेड बॉडी बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अपघातामुळे हे कामगार रस्त्यावर कोसळले. त्यांच्यासोबतच उसाचे लोडही खाली आले आणि कामगारांच्या अंगावर आदळले. त्यामुळे चार जण जागीच ठार झाले तर इतर 13 जण जखमी झाले. यातील काहींना किरकोळ मार लागला आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

असा झाला अपघात

रात्रीच्या अंधारात पिशोर घाटातून हा ट्रक चालला होता. उसामुळे ट्रकवर लोड अधिक होता. त्यामुळे ट्रक धीम्यागतीनेच सुरू होता. पण कन्नड घाटात वळण घेत असतानाच उसाचा ट्रक अचानक पलटी झाला. त्यामुळे उसासह कामगार रस्त्यावर पडले आणि उसाखाली कामगार दबले गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीच या कामगारांची डेडबॉडी बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. मृत झालेले चारही कामगार हे सातकुंड गावातील आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.