हावडा – प. बंगालमध्ये (West Bengal) आणखी एक कॅशकांड समोर आले आहे. ग्रामीण हावडा पोलिसांनी (Howrah Police) या प्रकरणी झारखंडच्या जामताडा येथील तीन काँग्रेस आमदारांना (Congress MLA) मोठ्या प्रमाणात रोख रकमेसह ताब्यात घेतले आहे. हे सगळेजण एका कारमधून प्रवास करीत होते. हे सर्व आमदार पूर्व मिदनापूरकडे जात होते. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास पांचला पोलीस ठाण्याच्या हद्दीत रानीहाटी वळणाच्या जवळ त्यांची कार पोलिसांनी थांबवली होती. कारची तपासणी करण्यात आली तेव्हा मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गाडीत असल्याचे समोर आले. माहिती मिळाल्य़ानंतर तातडीने पोलीस अधीक्षक स्वाती भंगलिया या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सांगितले की मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही नाकाबंदी करण्यात आली होती. याच वेळी झारखंडहून येणारी एक कार रोखण्यात आली. या कारमध्ये काँग्रेसचे तीन आमदार होते. राजेश कच्छप, नमन विक्सल आणि इरफान अन्सारी अशी या तीन आमदारांची नावे आहेत. या गाडीत मोठी बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे.
UTTERLY SHOCKING!
Huge amounts of cash recovered from a car of @INCIndia MLA from Jharkhand – intercepted at Howrah.
Apparently, 3 INC MLAs were travelling in the car.
Is ED going after only a select few? https://t.co/adUUhW5txr
— All India Trinamool Congress (@AITCofficial) July 30, 2022
कारमध्ये किती कॅश सापडली आहे, हे आत्ताच सांगणे अवघड असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहतीही पोलिसांनी दिली आहे. या कॅशची मोजणी मशीनद्वारे करावी लागणार आहे. या तिन्ही आमदारांची चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या कारवर जमताडा आमदाराची पाटीही लावण्यात आली होती. आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आमदाराच्या गाडीतच ही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात या तिन्ही काँग्रेसच्या आमदारांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. आता हे तिन्ही आमदार एवढी कॅश घेऊन बंगालमध्ये का आले होते, याचा शोध सुरु करण्यात आला आहे. यापूर्वी अर्पिता मुखर्जी या अभिनेत्रीच्या दोन फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात ५० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.ही रक्क्म प. बंगालचे माजी उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांची असल्याचे सांगण्यात येते आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांनी गैरव्यवहार केल्याचे सांगण्यात येते आहे. त्यांना ईडीने अटक केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली आहे. आता या झारखंडच्या प्रकरणाचे धागेदोरे कुणाकडे जातायेत, याचा तपास करण्यात येतो आहे.