Nagpur: 8 पुरुषांसोबत केलं लग्न, नंतर फसवणूक; ‘त्या’ महिलेल्या पोलिसांनी केली अटक

नागपूरमधील एक महिला शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करायची आणि नंतर त्यांची फसवणूक करायची. या महिलेला आता अटक करण्यात आली आहे.

Nagpur: 8 पुरुषांसोबत केलं लग्न, नंतर फसवणूक; त्या महिलेल्या पोलिसांनी केली अटक
Nagpur Women Crime
| Updated on: Aug 01, 2025 | 7:39 PM

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. एक महिला शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करायची. त्यानंतर लग्नाच्या एक महिन्यानंतर भांडण करून त्यांच्याकडून पैसे उकळायला सुरवात करायची आणि त्यांची फसवणूक करायची. या महिलेने आतापर्यंत 8 पुरुषांसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आता गिट्टीखदान पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, समीरा फातिमा असं आरोपी महिलेचे नाव आहे. ती उच्चशिक्षित असून ती शिक्षक म्हणूनही काम करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. त्यानंतर लग्न करायची आणि त्यांची फसवणूक करायची. गुलाम पठाण यांच्या तक्रारीनंतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षापासून फरार असलेल्या ‘लुटेरी दुल्हन’ ऊर्फ समीरा फातिमाला गिट्टीखदान पोलिसांनी आता अटक केली आहे. पोलिस कोठडीत आज तिचा पीसीआर आज संपणार आहे. आरोपी समीरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि त्यानंतर त्यांच्याशी लग्न करून खोटे निगांह नामा दाखवून फसवणूक करत होती.

ती विवाहित पुरूषांना महिन्याभरातच खोट्या आरोपात फसवण्याच्या धमक्या देत होती. कोर्टकेस करत सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती. ही फरार महिला सिव्हिल लाइन्स येथील टपरीवर चहा प्यायला आली असता पोलिसांनी तिला अटक केली आहे.

गुलाम पठाण यांनी मार्च 24 मध्ये या महिलेच्या विरोधात गिट्टीखदान पोलिसात तक्रार दिली होती. या महिलेने 2010 पासून अनेक विवाहित पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. लग्नानंतर ती ब्लॅकमेल करायची. नवीन नवऱ्याकडून ती पैसे उकळायची. तिने आतापर्यंत 8 लग्न केल्याच आरोप गुलाम पठाण यांनी केला होता.

ती एका शाळेत शिक्षिका आहे आणि नवीन लोकांशी बोलायची तेव्हा त्यांना माझा घटस्फोट झालेला आहे, अशी खोटी माहिती द्यायची. त्यानंतर पुरुषांना जाळ्यात ओढायची. मला तुमचा सहारा द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहील असं म्हणत ती मुस्लिम पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. त्यानंतर लग्न करायला लावायची आणि पैसे वसूल करायची. तिने आतापर्यंत 50 लाखं रुपयाची फसवणूक केली असल्याचेही पठाण यांनी म्हटलं आहे. आता या महिलेला अटक करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us