विद्यार्थ्यांना पुस्तकं कधी मिळणार?, मे महिन्याच्या अखेरपर्यंत बालभारतीकडून पुस्तक छपाई सुरुच, नेमकं कारण काय?

मे महिन्याच्या अखेरपर्यंत बालभारतीकडून पुस्तक छपाईचं काम सुरुचं आहे. Balbharati Pune school books printing

विद्यार्थ्यांना पुस्तकं कधी मिळणार?, मे महिन्याच्या अखेरपर्यंत बालभारतीकडून पुस्तक छपाई सुरुच, नेमकं कारण काय?
दिनकर पाटील, संचालक, बालभारती
| Updated on: May 27, 2021 | 12:38 PM

पुणे: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच वाटप होते. मात्र, यावर्षी मे महिना संपत आला, तरीही अद्याप महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे पाठ्यपुस्तक छपाईचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (ई-बालभारती) ई-पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध याही वर्षी देण्यात आली आहे. ( Balbharati Pune school books printing not completed due to case pending about paper in court )

पुस्तक छपाई लांबण्याचं कारण काय?

शालेय शिक्षण विभागातर्फे समग्र शिक्षा अभियानातंर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी बालभारतीकडून तब्बल नऊ कोटी पाठ्यपुस्तकांची छपाई केली जाते. मात्र,यंदा छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवर न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदा शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच 14 जूनपर्यंत पुस्तके उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येते.

उपलब्ध कागदाचा वापर करुन छपाई

सध्या बालभारतीकडे मागील वर्षीचा पुस्तकांचा काही साठा शिल्लक आहे. त्याशिवाय साठा म्हणून उपलब्ध असलेल्या कागदाचा वापर करून पुस्तकांची छपाई केली जाणार आहे. परंतु, शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक असेलच असे यंदा होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शाळा ऑनलाइनद्वारेच सुरू होणार आहेत, अशी माहिती बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

शाळा 14 जूनला सुरु

पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तर, जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांकडून नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले होते. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या:

शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर, पुढील शैक्षणिक वर्ष 14 जून पासून सुरू

दहावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाड यांना निवेदन, वाचा सविस्तर

( Balbharati Pune school books printing not completed due to case pending about paper in court )