CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन त्रिभाषा नियम या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही, नेमका निर्णय काय?

CBSE Three Language Policy : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नव्या त्रिभाषा धोरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नवीन त्रिभाषा नियम या विद्यार्थ्यांना लागू होणार नाही, नेमका निर्णय काय?
CBSE Three Language Policy
Image Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 7:12 PM

CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नव्या त्रिभाषा धोरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने जाहीर केले की, नव्या भाषा नियमांची अंमलबजावणी सध्या जुन्या नियमांनुसार शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार नाही. म्हणजेच, सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह सातवी, आठवी आणि नववीतील अनेक विद्यार्थ्यांवर तात्काळ नव्या नियमांचा परिणाम होणार नाही. या निर्णयामुळे नव्या भाषा धोरणाबाबत संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दहावीच्या विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही

CBSE ने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, त्यानुसार यावर्षी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्रिभाषा धोरण लागू केले जाणार नाही. हे विद्यार्थी आधीप्रमाणेच निश्चित विषय आणि भाषा व्यवस्थेनुसार शिक्षण घेतील आणि बोर्डाची परीक्षा देतील. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर किंवा परीक्षेच्या तयारीवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

सातवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा

बोर्डाने असेही स्पष्ट केले आहे की, सध्या सातवी, आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहावीत तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. म्हणजेच, जे विद्यार्थी सध्या ज्या भाषांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना अचानक नव्या भाषा धोरणानुसार परीक्षा द्यावी लागणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि नव्या नियमांमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

कोणत्या विद्यार्थ्यांना सूट मिळणार?

दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार विशेष सवलत दिली जाणार आहे, तसेच भारताबाहेरील CBSE शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भारतीय भाषा शिकण्यापासून सूट मिळेल. तसेच परदेशातून भारतात परतणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांनाही ही सवलत लागू असेल. एखाद्या विद्यार्थ्याचे कुटुंब दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास, तो नववीतही पूर्वी निवडलेल्या तीन भाषांचाच अभ्यास सुरू ठेवू शकतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित शाळेने त्या भाषांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे आवश्यक असेल.

शाळांसाठी CBSE चे निर्देश

CBSE ने त्रिभाषा व्यवस्थेबाबत शाळांना आवश्यकतेनुसार नवीन शिक्षकांची नियुक्ती, निवृत्त शिक्षकांची मदत, इतर शाळांतील शिक्षकांचे सहकार्य तसेच ऑनलाइन किंवा हायब्रिड माध्यमातून अध्यापनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. बोर्डाचे म्हणणे आहे की, या नव्या त्रिभाषा व्यवस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण वाढवणे नसून, त्यांची भाषिक समज आणि बहुभाषिक कौशल्ये विकसित करणे हा आहे. या बदलामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही आणि शाळांना आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Follow Us