SSC Exam : दहावीचा बोर्डाचा पेपर फुटला, परीक्षा मंडळाचे सर्व दावे फोल, कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा

ssc paper leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

SSC Exam : दहावीचा बोर्डाचा पेपर फुटला, परीक्षा मंडळाचे सर्व दावे फोल, कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा
जालन्यात दहावीचा पेपर फुटला
| Updated on: Feb 22, 2025 | 1:51 PM

SSC Paper Leak: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे शुक्रवारी पहिल्या दिवशी फोल ठरले आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर आता या प्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार? याकडे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. जालन्यानंतर यवतमाळमध्ये पेपर फुटला आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंधरा मिनिटांत प्रश्नपत्रिका बाहेर

राज्यामध्ये शुक्रवारपासून (२१ फेब्रुवारी) दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. परंतु माय मराठीच्या पहिल्या पेपरला गालबोट लागले. शुक्रवारी सकाळी 11 वाजता परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवला गेला. जालना शहरातील झेरॉक्ससेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंटाकाढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले.

केंद्रावर उत्तरपत्रिकेची झेरॉक्स

जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला. सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत होती. जालना जिल्ह्यात 102 परीक्षाकेंद्रावर जवळपास 32 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा आहे. आता हा पेपर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कुठे कुठे पर्यंत पोहचला, त्याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे. परंतु या प्रकारामुळे परीक्षा मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी केलेली जय्यत तयारीचा फज्या उडल्याचे समोर आले आहे.

चोख व्यवस्थेनंतरही पेपर फुटला

राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेसाठी भरारीपथके, व्हिडिओ चित्रण, सीसीटीव्ही या सर्वांचीच चोख व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारींनी बैठका घेतल्या होत्या. संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवले होते. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही ठिकाणी कर्मचारी बदलण्यात आले होते. त्यानंतरही पेपर फुटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जळगावमध्ये कॉफीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा

जळगावमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉफीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. जळगाव शहरातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीबहादरांकडून सर्रास पुरवल्या जात आहेत. तसेच काही परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच कॉपी बहाद्दर कॉपी पुरवताना दिसत आहे.