अवघ्या काही तासात काळजात धडधड… सलग दुसऱ्यांदा जोरदार भूकंप; अख्खा देशच हादरला
इंडोनेशियामध्ये अवघ्या काही तासांत दोन शक्तिशाली भूकंपांनी हाहाकार माजवला. सकाळी 7.7 आणि नंतर 6.8 तीव्रतेचे धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे; किमान 38 लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. अनेक इमारतींचे नुकसान झाले, वीज गेली आणि भूस्खलनही झाले. त्सुनामीचा इशाराही जारी करून मागे घेण्यात आला.

इंडोनेशियात आज दुसऱ्यांदा धरणीकंप झाला. अवघ्या काही तासातच जमीन हादरल्याने इंडोनेशियन नागरिकांच्या काळजात धडधड सुरू झाली. मिळेल त्या मार्गाने लोक घरातून बाहेर पळाले. अंगावर असलेल्या कपड्यानिशी लोकांनी घराबाहेर धाव घेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोक आरडाओरड करत होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी नोंदवली गेली आहे. नॉर्थ सुमात्रात हा भूकंप झाला. मात्र, भूकंपातील नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
इंडोनेशियात सकाळी इंडोनेशियाके फ्लोरेस परिसरातील तटावर भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 एवढी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही तासातच भूकंपाचा दुसरा आणि तितकाच तेज झटका बसला, या भूकंपाची नोंद रिश्टर स्केलवर 6.8 इतकी करण्यात आली आहे. सकाळी झालेल्या भूकंपात कमीत कमी 38 लोक मृत्यू पावल्याचं सांगितलं जात आहेत. आताच झालेल्या भूकंपाचे झटके 163 किमी खोलवर नोंदवण्यात आले आहेत. याची पुष्टी जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसायन्सने केली आहे.
त्सुनामीचा इशारा
सकाळी भूकंप आल्यानंतर नुसा तेंगाराच्या काही भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. पण अनेक भागात भूकंपाचे झटके जाणवले होते. या भूकंपामुळे किती नुकसान झालं याचा अंदाज घेण्यासाठी अधिकाऱ्यांना रुग्णालये रिकामी करावी लागली. या भूकंपात इमारतींचं मोठं नुकसान झालं.
वीज गेली, दरड कोसळली
इंडोनेशियात सकाळी झालेला भूकंप अत्यंत भयानक होता. या भूकंपात 38 लोकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले. असंख्य इमारती आणि घरांना नुकसान झालं. भूकंपामुळे दरडी कोसळल्या, काही ठिकाणी भूस्खलन झालं. अनेक ठिकाणी तर बत्तीगुल झाली. काही भागात संपर्क व्यवस्था बाधित झाली. भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले. त्यामुळे रेस्कू टीमला भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या नागेकेओ परिसरात जाता आलं नाही. या भूकंपाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यात इमारतींचं अवघ्या काही तासात कसं ढिगाऱ्यात रुपांतर झालंय हे दिसून येत आहे.
इमारती कोसळताच धुराचे लोट आकाशभर उसळताना आणि ते पाहून लोक जीवमुठीत घेऊन पळताना दिसत आहेत. लोक रस्त्यावर सैरावैरा धावताना आणि आकांडतांडव करताना दिसत आहे. देशभरात हीच परिस्थिती असल्याने संपूर्ण देशातच बचाव कार्य सुरू आहे. हे बचाव कार्य सुरू असतानाच दुसरा भूकंप झाल्याने नागरिकांच्या पोटातच गोळा आला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, तालिपुरामध्ये राहणाऱ्या 51 वर्षीय नोनाच्या म्हणण्यानुसार, हा भूकंप अत्यंत शक्तीशाली होता. या भूकंपाचा झटका इतका तीव्र होता की आम्ही घरात आराम करत असताना खडबडून जागे झालो.
