NEET पेपरफुटीनंतर परीक्षा पॅटर्नमध्ये ऐतिहासिक बदल, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, कशी होणार परीक्षा?
नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्यानंतर एनटीएने पुनर्परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता २१ जून रोजी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती येथे वाचा.

वैद्यकीय प्रवेशासाठी देशातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट यूजी २०२६’ (NEET UG) परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे अखेर रद्द करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) पुनर्परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरच अवलंबून राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा पद्धतीत ऐतिहासिक बदल
नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी पेपरफुटीबद्दल सरकारची भूमिका काय याचे स्पष्टीकरणही दिले. नुकत्याच पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून नीट परीक्षा पूर्णपणे संगणक-आधारित (Computer Based) म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थी ओएमआर (OMR) शीटऐवजी संगणकासमोर बसून परीक्षा देतील.
नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा रद्द करण्यामागचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ३ मे २०२६ रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडली होती. त्यानंतर ७ मे २०२६ रोजी एनटीएच्या तक्रार निवारण प्रणालीमध्ये काही संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर अंतर्गत चौकशी सुरू झाली आणि हे प्रकरण संबंधित यंत्रणांकडे सोपवण्यात आले. यानंतर १२ मे २०२६ चौकशीदरम्यान शिक्षण माफियांनी परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारी प्रश्नपत्रिका (Guess Papers) वितरीत केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कडक इशारा दिला आहे. “अनियमिततेबाबत सरकारचे ‘शून्य-सहिष्णुता’ (Zero-Tolerance) धोरण आहे. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून परीक्षा माफियांविरुद्ध तीव्र लढा सुरू आहे. पैशाच्या जोरावर कोणत्याही चित्रविचित्र मार्गाने माफिया उमेदवारांची जागा हिसकावून घेऊ शकणार नाहीत, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. यांनी दिला.
सरकारकडून महत्त्वपूर्ण सवलती जाहीर
- प्रवेशपत्र (Admit Card): पुनर्परीक्षेची तारीख २१ जून निश्चित करण्यात आली असून, या परीक्षेचे प्रवेशपत्र १४ जून २०२६ रोजी जारी केले जाईल.
- शुल्क माफी (No Fees): रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाईल. तसेच, २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
- परीक्षा केंद्राची निवड: उमेदवारांना पुनर्परीक्षेसाठी आपल्या पसंतीचे शहर/केंद्र निवडण्याची मुभा दिली जाईल. यासाठी एनटीएतर्फे विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ दिला जाणार आहे.
- अतिरिक्त वेळ: ऑनलाइन परीक्षेच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना त्यांचा तपशील भरण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटे दिली जातील.
पावसाळ्याचे आव्हान आणि वाहतुकीचे नियोजन
जून महिन्यात देशाच्या अनेक भागांत पावसाळा सुरू होत असल्याने खराब हवामानाचा विचार केला जात आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर व्हावा यासाठी केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करत असून, दोषी आढळणाऱ्या एकाही व्यक्तीला सोडले जाणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.