Tamasha: जिंदगाणीचा तमाशा थांबला! सेवाश्रमातून बाहेर पडेल माणूस भला

| Updated on: Jul 06, 2022 | 5:57 PM

Tamasha: तमाशा कलावंतांच्या मुलांच्या जिंदगाणीचा तमाशा अखेर थांबला. त्यांच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा प्रश्न मिटला. त्यांच्यासाठी औरंगाबाद शहरात वसतिगृह सुरु झाले आहे. जीवनात उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ मिळाले आहे.

Tamasha: जिंदगाणीचा तमाशा थांबला! सेवाश्रमातून बाहेर पडेल माणूस भला
सेवाश्रमाने थांबविला आयुष्याचा तमाशा
Image Credit source: TV9marathi
Follow us on

औरंगाबाद : तमाशात (Tamasha) काम करणा-या मुलींपेक्षा मुलांची मोठी परवड होते. मुलींकडे कुटुंबीय खास लक्ष देतात, पण मुलांच्या पदरी घोर निराशा पडते. त्यांचे शिक्षण घेण्याच्या स्वप्नांचा (Dream to Education) तमाशा होतो. या दुर्लक्षित मुलांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली आहे. त्यांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. त्यांना उच्च शिक्षण (Higher Education) घेऊन जीवनात उत्तुंग भरारी घेता येणार आहे. या मुलांसाठी सुरेश राजहंस (Suresh Rajhans) यांनी बीड जिल्ह्यातील ब्रह्मनाथ येळंब येथे चिकाटीने कार्य सुरु ठेवलेले आहे. आता त्यांनी सेवाश्रम संस्थेच्या माध्यमातून औरंगाबाद येथे सुद्धा या मुलांच्या शिक्षणाचीच नाही तर राहण्याची सोय केली आहे. सातारा परिसरात या मुलांसाठी त्यांनी नव्याने वसतिगृह सुरु केले आहे. या वसतिगृहात तमाशा कलावंतांच्या 15 मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय झाली आहे. एवढेच नाही तर या मुलांसाठी अनेक हात ही मदतीसाठी सरसावले आहे. राजहंस यांच्या प्रयत्नातून भली माणसं समाजात येणार आहेत.

बीडमध्ये ही उपक्रम

तमाशामध्ये काम करणाऱ्या कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न बीड जिल्ह्यातील सुरेश व मयूरी राजहंस हे पतीपत्नी हाताळत आहेत. त्यांच्या ब्रह्मनाथ येळंब येथील सेवाश्रम या स्वयंसेवी संस्थेमध्ये कलावंत व विविध कारणाने अनाथ झालेली 55 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तमाशात काम करणा-या मुलांच्या आयुष्यात पहाट उगवण्याचे काम हे दाम्पंत्य करत आहे. त्यांच्या उच्च शिक्षणाचा विडा त्यांनी उचलला आहे. या हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी यापूर्वी शेजारच्या तालुक्यातील शाळांमध्ये प्रवेश दिला होता. परंतू, या मुलांसोबत संपर्क ठेवणे जिकरीचे होत असल्याने त्यांच्यासाठी काही तरी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हीच आयडियाची कल्पना या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. या नव्या उपक्रमामुळे इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी मधील शिक्षण घेणा-या 15 मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय झाली.

हे सुद्धा वाचा

मदतीचे हात ही सरसावले

या मुलांच्या राहण्याची व्यवस्था तर झाली. परंतू,ग्रामीण भागात शिक्षणासाठी होणारा खर्च आणि शहरातील खर्च यात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे गणवेशासह शुल्क तसेच पाठ्यपुस्तके हा खर्च देणगीदारांकडून मिळविण्यात आला. शहरातील वसतिगृहासाठी शोधलेल्या जागेचे भाडेही आता खूप कमी आकारण्यात आले आहे. सहृदयी माणसे या उपक्रमामागे भक्कमपणे उभे राहत आहेत. सद्गुरू सेवा साहित्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दर महिन्याच्या किराण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी लागणारा निधी ते देत आहेत. त्यामुळे आता तमाशा कलावंतांना उच्च शिक्षण मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.