Election Results 2022 | पाचही राज्यांमध्ये ‘हात’ रिकामे, काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, अध्यक्ष निवडीच्या हालचाली

| Updated on: Mar 11, 2022 | 10:11 AM

काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्या घरी आज किंवा उद्या काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे.पाच राज्यात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस तातडीची बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Election Results 2022 | पाचही राज्यांमध्ये हात रिकामे, काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक, अध्यक्ष निवडीच्या हालचाली
राहुल गांधी
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालात (Election Result 2022) भाजपने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतली, तर पंजाबमध्ये आपचा झाडू चालल्याने इतरांचा सुपडा साफ झाला. मात्र पाचपैकी एकाही राज्यात काँग्रेसला (Congress) जादू दाखवता आली नाही. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वात लढलेल्या काँग्रेसची तर पुरती वाट लागली. या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन केले जाणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अध्यक्ष निवडण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्या घरी आज किंवा उद्या काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे.पाच राज्यात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस तातडीची बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेस अध्यक्षपदाची कमान आहे. सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेस अध्यक्षाची निवड करणार असल्याचं वृत्त काही महिन्यांपूर्वी आलं होतं. मात्र त्याआधीच विधानसभा निवडणुकांच्या निकालात मोठा धक्का बसलेल्या काँग्रेसला सक्रिय अध्यक्षांची गरज भासत असल्याचं दिसतं. मध्यंतरी राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती, मात्र लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला. आता पुन्हा राहुल गांधींच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पवारांनी इतिहास सांगितला

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये खरेच काँग्रेसचे अस्तित्व संपले आहे का, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता. ते म्हणाले की, तुम्हाला मागच्या काही निवडणुकांची माहिती नसेल. मात्र, यापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली. 1977 मध्ये देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात अशी सगळीकडे काँग्रेसची सत्ता गेली. मात्र, त्यानंतर पुन्हा 1980 मध्ये झालेल्या निवडणूक काँग्रेस सत्तेत आली. तिथून पुढे काँग्रेस पुन्हा फॉर्ममध्ये आली. राजकारणात पक्ष कधी ना कधी हरतो. त्यामुळे फार निराश होण्याची गरज नाही. गोव्यातही काँग्रेसची ही स्थिती बदलेल याची खात्री आहे. सध्या पाच राज्यात पराभव झाला. त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील जनादेश स्वीकारावा लागेल. पुढे नियोजन करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या :

उत्तर प्रदेशात भाजपचा विजय, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, शिवसेनेला धरलं धारेवर

गोव्यातील भाजपच्या विजयात जी किशन रेड्डींचा मोठा वाटा, रणनिती आणि जनसंपर्कामुळे तिसऱ्यांदा सत्ता 

पंजाब जिंकणाऱ्या केजरीवालांविरोधात मोदींनी रणशिंग फुंकलं? मी विश्वास देतो की…