देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हर्षवर्धन पाटलांचं अजित दादांकडे बोट!

| Updated on: Apr 05, 2024 | 9:11 PM

इंदापुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या वेळी या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी युती धर्माचे पालन करण्यासाठी थेट अजित पवारांकडे बोट केले आहे. महायुतीचा धर्म मित्रपक्षांनीही पाळावा, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हर्षवर्धन पाटलांचं अजित दादांकडे बोट!
Follow us on

Baramati Loksabha : सुनेत्रा पवार यांच्या विरोधातलं विजय शिवतारे यांचं बंड काही दिवसांआधीच शांत झालं आहे. आता हर्षवर्धन पाटलांचंही समाधान झालंय. मात्र इंदापुरातल्या मेळाव्यात फडणवीसांच्या समोरच हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांकडे बोट दाखवलंय. महायुतीचा धर्म मित्रपक्षांनीही पाळावा, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा संघर्ष इंदापुरात नवा नाही. भोरमधून विजय शिवतारेंचं बंड शांत केल्यानंतर, हर्षवर्धन पाटलांच्याही फडणवीसांसोबत बैठका झाल्या. त्या बैठकीत इंदापुरात फडणवीसांचा मेळावा घ्यावा, असं ठरलं. त्यानुसार बारामतीत सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी फडणवीसांनी इंदापुरात मेळावा घेतला.

ज्या प्रकारे मदतीच्या मोबदल्यात मदतीची अपेक्षा, हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांकडून व्यक्त केली. त्याच प्रकारे ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अन्याय होऊ नये, असं हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील म्हणाल्या आहेत.

आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल होत, असून कारवाईसाठी येणारे फोन बंद करा हेही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. त्यामुळं असे फोन नेमके कोण करतात, अशी चर्चा आता सुरु झालीये. बारामती लोकसभेत एकूण 6 तालुके येतात. त्यात भोरमधून विजय शिवतारेंनी माघार घेतली. आता इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांचंही समाधान झालंय. हर्षवर्धन पाटलांसह इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारत असल्याचं जाहीरपणे फडणवीस म्हणाले आहेत.

बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात आहेत. त्यांची लढाई सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. मात्र पवार विरुद्ध पवार अशी लढाई नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. याच सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय.

सुप्रिया सुळे तीन वेळा खासदार

बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रेय भरणे यांच्याकडून पराभव झाला होता. जे होऊन गेले ते विसरून नव्या उमेदीने मोठ्या ध्येयाच्या दिशेने काम करायला हवे, असे फडणवीस म्हणाले. निवडणुकीदरम्यान विरोधक सहानुभूती कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतील, मात्र मतदारांना मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. असं देखील ते म्हणाले.

महाराष्ट्रातील 48 जागांवर 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे.