याला म्हणायचं नशीब, 3 दिवस एकही प्रेक्षक मिळाला नाही, चित्रपट हटवताच गुरुवारी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, तिकीट देखील मिळेना

1983 मधील या चित्रपटाला 3 दिवस मिळाले नाहीत प्रेक्षक, शेवटी थिएटरमधून काढण्यात आला चित्रपट. मात्र, गुरुवारी अचानक बदलले नशीब. तिकीट देखील मिळेना. नेमकं काय घडलं?

याला म्हणायचं नशीब, 3 दिवस एकही प्रेक्षक मिळाला नाही, चित्रपट हटवताच गुरुवारी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, तिकीट देखील मिळेना
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 24, 2026 | 5:15 PM

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सुरुवातीला अपयशी ठरतात, पण नंतर अचानक त्यांचे नशीब बदलते. असाच एक भन्नाट कथा असणारा 1983 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘मासूम’. सुरुवातीला पूर्णपणे फ्लॉप ठरेल असे वाटणाऱ्या या चित्रपटाने पुढे प्रचंड यश मिळवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासाठी हा काळ अत्यंत कठीण होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रेक्षकच येत नव्हते. परिस्थिती इतकी वाईट होती की अनेक शो पूर्णपणे रिकामे जात होते. स्वतः शेखर कपूर जेव्हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेले, तेव्हा हॉलमध्ये फक्त दोनच लोक उपस्थित होते. त्यापैकी एक ते स्वतः होते. हा अनुभव त्यांच्यासाठी मोठा धक्का देणारा होता आणि त्यांना वाटू लागले की त्यांचे करिअर सुरू होण्यापूर्वीच संपेल.

चित्रपटाच्या खराब सुरुवातीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाला शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांमध्ये कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मंगळवारी वितरकांनी शेखर कपूर यांना फोन करून चित्रपट थिएटरमधून काढायला सांगितला. कारण थिएटरमध्ये चित्रपट ठेवणे त्यांच्यासाठी तोट्याचे ठरत होते. परिणामी, काही मोजक्या थिएटरशिवाय हा चित्रपट जवळपास सर्वत्र काढून टाकण्यात आला.

गुरुवारमुळे बदलले नशीब

मात्र, इथेच या चित्रपटाच्या नशिबाने कलाटणी घेतली. गुरुवारी अचानक प्रेक्षक थिएटरकडे वळू लागले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल जाऊ लागले. शेखर कपूर यांना सतत फोन येऊ लागले की तिकीट मिळणे कठीण झाले आहे. हा बदल कसा झाला, याचे उत्तर आजही त्यांच्याकडे नाही. त्यांनी स्वतः कबूल केले की तो गुरुवार नसता तर ते आज जिथे आहेत तिथे पोहोचले नसते.

‘मासूम’ या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, शबाना आजमी, तसेच बालकलाकार म्हणून उर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाने पुढे बजेटच्या सुमारे 5 पट कमाई केली आणि 1983 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. आजही हा चित्रपट आपल्या कथानक, अभिनय आणि भावनिक मांडणीसाठी ओळखला जातो.

Follow Us