जया बच्चन यांची कथा अन् एका रात्रीत बदलले अमिताभ बच्चन यांचे नशीब, चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, कमाई…
जया बच्चन यांनी लिहिलेली चित्रपटाची कथा ठरली ब्लॉकबस्टर. अमिताभ बच्चन यांचे एका रात्रीत बदलले नशीब. चित्रपटाने 2 बजेटमध्ये केली 12 कोटींची कमाई.

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी म्हणजे सुवर्णकाळाची आठवण. मात्र एक काळ असा होता, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत चढ-उतार सुरू होते आणि त्यांना एका मोठ्या हिटची गरज होती. अशा वेळी जया बच्चन यांनी उचललेलं एक पाऊल त्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरलं.
1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘शहंशाह’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला. विशेष म्हणजे, या चित्रपटाची कथा जया बच्चन यांनी लिहिली होती.
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश
सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जवळपास 12 कोटी रुपयांची कमाई केली. जी त्या काळात मोठी हिट मानली जात होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत दिसले. एकीकडे ते प्रामाणिक पोलीस अधिकारी होते तर दुसरीकडे ‘शहंशाह’ बनून गुन्हेगारांविरुद्ध लढणारा दमदार नायक. चित्रपटातील त्यांचा प्रसिद्ध डायलॉग रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं… आजही लोकांच्या ओठांवर आहे.
1980च्या दशकात नवीन कलाकार इंडस्ट्रीत येत असताना अमिताभ बच्चन यांना एका मोठ्या यशाची गरज होती. ही उणीव या चित्रपटाने भरून काढली आणि त्यांना पुन्हा ‘महानायक’ म्हणून स्थिर केलं. जया बच्चन यांनी लिहिलेल्या कथेत एक असा नायक दाखवण्यात आला, जो दिवसा पोलीस अधिकारी असतो, पण रात्री ‘शहंशाह’ बनून अन्यायाविरुद्ध लढतो. या कथेत अॅक्शन, ड्रामा आणि सामाजिक संदेश यांचा उत्तम संगम होता. त्यामुळे हा चित्रपट फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही तर प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.
गाणी आणि कलाकारांची ताकद
या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. किशोर कुमार यांचं ‘अंधेरी रातों में…’ आणि लता मंगेशकर यांचं ‘जाने दे मुझे जाना है’ ही गाणी आजही आवडीने ऐकली जातात. चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.
हा चित्रपट केवळ अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा नाही, तर जया बच्चन यांच्या लेखनकौशल्याचाही उत्तम नमुना आहे. या चित्रपटाने सिद्ध केलं की योग्य कथा आणि दमदार सादरीकरण असेल तर कोणत्याही कलाकाराला पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचता येतं.