“तो खोटारडाच..”, अखेर अडीच वर्षांनंतर अनुराग कश्यपवर भडकला अभय देओल, ‘त्या’ वादग्रस्त घटनेविषयी व्यक्त

| Updated on: Jan 22, 2023 | 9:59 AM

दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभयवर अडीच वर्षांपूर्वी काही आरोप केले होते. या आरोपांवर उत्तर देताना आता अभयने अनुरागवर सडकून टीका केली. इतकंच नव्हे तर त्याने अनुराग कश्यपला खोटारडा असं म्हटलं आहे.

तो खोटारडाच.., अखेर अडीच वर्षांनंतर अनुराग कश्यपवर भडकला अभय देओल, त्या वादग्रस्त घटनेविषयी व्यक्त
Anurag Kashyap and Abhay Deol
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: अभिनेता अभय देओल सध्या त्याची आगामी वेब सीरिज ‘ट्रायल बाय फायर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अभयने अडीच वर्षांपूर्वीच्या वादावर मौन सोडलं आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अभयवर अडीच वर्षांपूर्वी काही आरोप केले होते. या आरोपांवर उत्तर देताना आता अभयने अनुरागवर सडकून टीका केली. इतकंच नव्हे तर त्याने अनुराग कश्यपला खोटारडा असं म्हटलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2020 मध्ये एका मुलाखतीत अनुराग कश्यपने अभय देओलवर काही आरोप केले होते. अभयसोबत काम करणं अत्यंत कठीण आणि त्रासदायक असल्याचं त्याने म्हटलं होतं. “अभयसोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला नाही. देव डीच्या सेटवर त्याचं वागणं ठीक नव्हतं. देओल असल्याने त्याला सेटवर सर्व प्रकारच्या सुविधा पाहिजे होत्या. तो एकमेव असा कलाकार होता जो शूटिंगच्या वेळी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता. तर दुसरीकडे संपूर्ण टीम पहाडगंजमध्ये राहत होती. जेणेकरून कमी बजेटमध्ये चित्रपट शूटिंग करता येईल. याच कारणामुळे अनेक दिग्दर्शक त्याच्यापासून चार हात लांबच राहतात”, असे आरोप अनुरागने केले होते.

आता अडीच वर्षांनंतर अभयने या आरोपांवर उत्तर दिलं आहे. “अनुराग सार्वजनिकरित्या माझ्याबद्दल बरंच काही खोटं बोलला आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची मागणी मी केली नव्हती. तो स्वत:हून माझ्याकडे आला होता आणि म्हणाला की तू आमच्यासोबत राहू शकत नाही, कारण तू देओल कुटुंबातून आहेस”, असं त्याने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

“मी आजपर्यंत याविषयी कधीच बोललो नाही कारण आयुष्य खूप छोटं आहे आणि अनुभवण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात अशी टॉक्सिक व्यक्ती नकोय. अनुराग कश्यप अत्यंत खोटारडा आणि मनात विष पसरवणारा आहे. अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला मी देईन”, असं तो पुढे म्हणाला.

“अनुराग कश्यपने मला खूप काही शिकवलं आहे. त्याला पाहून मी अशा विषारी व्यक्तींपासून लांबच राहण्याचं ठरवलं आहे. जे स्वत:ला दिग्दर्शक म्हणवतात, मात्र ते खोटारटे आणि नीच असतात. अनेकांना मी त्याच्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. अनुरागने माझ्याविषयी खोटं सांगितल्यानंतर त्याने मला माफीचाही मेसेज केला होता. त्यावेळी मी त्याला माफसुद्धा केलं होतं,” असं अभयने सांगितलं.