Allu Arjun: चिरंजीवी, रामचरण यांच्याशी अल्लू अर्जुनचा वाद? चर्चांवर अखेर अल्लू अरविंद यांनी सोडलं मौन
चिरंजीवी आणि अल्लू अर्जुन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा मनोरंजनविश्वात होत आहेत. रामचरण आणि अल्लू अर्जुन यांच्यातही काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे.

मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi), त्यांचा मुलगा रामचरण (Ram Charan) आणि स्टायलिश स्टार म्हणून ओळखला जाणारा अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांचे कौटुंबिक संबंध आहेत. अल्लू अर्जुन हा चिरंजीवी यांचा पुतणा आहे, त्यामुळे रामचरण आणि अल्लू अर्जुन हे चुलत भावंडं आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हे तीन मोठे सेलिब्रिटी सध्या यशाच्या शिखरावर आहेत. एकीकडे रामचरणचा RRR हा चित्रपट तुफान गाजला, तर दुसरीकडे अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रेक्षकांकडून वाहवा मिळाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून या तिघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर अखेर अल्लू अर्जुनच्या वडिलांनी मौन सोडलं आहे.
नेमकं काय घडलं?
चिरंजीवी आणि अल्लू अर्जुन यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा मनोरंजनविश्वात होत आहेत. रामचरण आणि अल्लू अर्जुन यांच्यातही काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. 22 ऑगस्ट रोजी चिरंजीवी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. मात्र त्यावेळी अल्लू अर्जुन अमेरिकेला गेला. काकांच्या वाढदिवसाला त्याची अनुपस्थिती असल्याने वादाच्या चर्चांना आणखी उधाण आलं. या चर्चांवर आता ज्येष्ठ निर्माते आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अल्लू अरविंद?
अल्लू अर्जुन हा चिरंजीवी यांच्यासाठी त्यांच्या मुलासारखाच आहे. अल्लू अर्जुनने लहानपणापासून जे काही केलं, त्याला चिरंजीवी यांनी साथ दिली आणि ते अजूनही देत आहेत. तो नेहमीच चिरंजीवी यांचा चाहता असेल, असं अल्लू अरविंद म्हणाले.
चिरंजीवी लवकरच ‘गॉडफादर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान पाहुण्याच कलाकाराची भूमिका साकारतोय. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. बॉक्स ऑफिसवरील ‘पुष्पा’च्या यशानंतर आता त्याच्या सीक्वेलची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.