ती परत येतेय..; अमोल कोल्हेंकडून मोठी घोषणा, सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका लवकरच..

अमोल कोल्हे यांनी निर्धार केल्याप्रमाणे 'सावित्रीबाई ज्योतिराव फुले' या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांची मालिका 14 जून रोजी संपुष्टात आली. त्यानंतर त्यांनी हा प्रवास पुढे सुरू राहणार असल्याचा संकल्प केला होता.

ती परत येतेय..; अमोल कोल्हेंकडून मोठी घोषणा, सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका लवकरच..
अमोल कोल्हे यांच्याकडून नव्या मालिकेची घोषणा
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2026 | 11:04 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये अचानक बंद करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 14 जून रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित झाला. त्यानंतर आता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका लवकरच पुन्हा छोट्या पडद्यावर सुरू होणार आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनी मालिका कशाप्रकारे बंद पाडली जातेय, याबाबत अमोल कोल्हे यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मालिकेसाठी 50 लाख रुपये तर जितेंद्र आव्हाड यांनी 10 लाख रुपये मदत जाहीर केली होती.

टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळण्यात आली. याबद्दल अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर सातत्याने नाराजी व्यक्त केली होती. पण त्याचसोबत मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता नुकतीच त्यांनी या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. मात्र ही मालिका कोणत्या वाहिनीवर सुरू होणार, त्यात कोणते कलाकार असणार, याविषयी माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

अमोल कोल्हे यांच्याकडून मालिका वाचवण्यासाठी खूप धडपड सुरू होती. त्यांनी ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला होता. 14 जूनला स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यानंतर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी मालिकेसाठी आर्थिक मदत केली. “पैसा कसा उभा राहणार हे मला माहीत नाही. पण मला फक्त एवढंच माहीत आहे की जर हा देश वाचवायचा असेल, तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्राने केलंय. हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर त्याची वैचारिक बैठक मजबूत करण्याचं काम पुन्हा करावं लागेल. त्यामध्ये खारीचा वाटा का होईना, या माध्यमातून उचलला जात असेल, तर माझी तयारी आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले होते.

Follow Us