मोठ्या सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट, औक्षण करत, गुलाबजाम भरवत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं दणक्यात स्वागत
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर महाराष्ट्रातील शाळा आजपासून सुरू झाल्या. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरात विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कुठे औक्षण, गुलाबजाम, फुलांनी स्वागत, तर कुठे जंगल थीम आणि ट्रॅक्टर मिरवणुकीचे आयोजन केले होते. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय बनवण्यासाठी शिक्षकांनी विशेष तयारी केली होती, ज्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

एप्रिल आणि मे महीना, असे तब्बल दोन महिने उन्हाळ्याची सुट्टी मिळाल्यानंतर विदर्भ वगळता महाराष्ट्राती इतर भागातील शाळा आजपासून ( सोमवार 15 जून) सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळेचा पहिला दिवस असून राज्यभरात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर , परळी, रत्नागिरी अशा अनक ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. कुठे विद्यार्थ्यांचं औक्षण, तर कुठे गुलाबजाम भरवून त्यांचं स्वागत झालं. साताऱ्यात तर चिमुरड्यांचे ‘जंगी’ स्वागत झालं. विविध वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढली तसेच ढोल-ताशांच्या गजराने शाळा आणि गाव दोन्ही दुमदुमलं. नाशिकच्या एका शालेत तर विद्यार्थ्यांसाठी खास जंगल थीम तयार करण्यात आली. जाणून घेऊया सविस्तर..
अहिल्यानगर – विद्यार्थी येण्यापूर्वी शाळा घासून, धुवून स्वच्छ
आज शाळेचा पहिला दिवस, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून आजपासून शाळा सुरू झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली. शाळेतील शिक्षकांनी शाळा स्वच्छ धुऊन काढली तसेच शाळेचा परिसर देखील स्वच्छ केला आहे. विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रमाची पुस्तक गणवेश शाळेमध्ये दाखल झाले. यावर्षी प्रशासनाकडून शाळेचा पहिली तासिका खेळाची घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खडकी येथील शाळेत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून स्वागत केलं जाणार आहे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांमध्ये देखील शाळा सुरू होत असल्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
परळी – शाळेचा पहिला दिवस औक्षण, गुलाबजाम भरवत विद्यार्थ्यांचे स्वागत
उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळेचा पहिला दिवस आहे आणि आज परळीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आलाय.पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. आज पहिल्याच दिवशी शाळेकडून विद्यार्थ्यांचे औक्षण करत स्वागत करण्यात आलय.इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना हातात फुल देऊन त्यांना गुलाबजाम देखील भरवण्यात आले.विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट देखील करण्यात आला असून या स्वागताने विद्यार्थी भारावून गेलेले दिसून आले.आज पुन्हा एकदा शाळेमध्ये विद्यार्थ्यांची लगबग दिसून आलीये.
नाशिक – नवरचना विद्यालयात जंगल थीम
दीर्घ सुट्टीनंतर आज पासून नाशिक शहर आणि परिसरातील शाळा पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस सुखद आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी नाशिकमधील विविध शाळांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील नवरचना विद्यालयात जंगल थीम तयार करण्यात आली शाळेचा पहिला दिवस सुखकर आनंदी व्हावा आणि पर्यावरण पूरक व्हावं यासाठी शाळेकडून विशेष आयोजन करण्यात आलं. येणाऱ्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून शाळेत प्रवेश दिला जाणार आहे तर शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फुल देऊन स्वागतही केलं जाणार आहे. शाळेच्या परिसरामध्ये संपूर्ण जंगल थीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी शाळेत येत असताना गुहा तयार करण्यात आली आहे आणि यातून शाळेत येताना कंटाळा न येता आनंद व्हावा यासाठी प्रयोजन करण्यात आला आहे.
पुणे – शाळेच्या वतीने नवीन विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण , पुस्तक आणि खाऊ देऊन स्वागत
पुण्यातही उन्हाळी सुट्ट्याच्या प्रदिर्घ कालावधीनंतर शाळा आज पासून सुरू झाल्या. शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. खूप दिवसानंतर मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटल्यानंतर आज आनंद होत आहे अशी भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील अंतराळ लॅब मध्ये लहान मुलांबरोबर हितगुज केलं.
मुंबई – चिमुरड्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज
मोठ्या सुट्टी नंतर आज शाळेची पहिली घंटा आज वाजत असून चिमुरड्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झालेत. ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई शहर व उपनगरांतील शाळा, तेथील शिक्षक लहान मुलांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. लहान मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांच्या वतीने गुलाबाची फुल आणि पेढे देऊन स्वागत केलं जात आहे.
रत्नागिरी – हजारो विद्यार्थ्यांचे आज ‘पहिले पाऊल’
रत्नागिरी जिल्ह्यात 10 हजार 91 विद्यार्थ्यांचे आज ‘पहिले पाऊल’ पडणा्र आहे. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला आजपासून उत्साहात सुरुवात झाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आज श्रीगणेशा होणार आहे. शाळांमध्ये ‘विद्यारंभ’ सोहळ्याचे उत्साही वातावरण आहे. चिपळूण तालुक्यातील १ हजार २१९ विद्यार्थी आज पहिलीत प्रवेश करणार. त्यांचे फुलांनी स्वागत करण्यात येणार आहे, तसेच गोडधोड देण्यात येणार असून विविध उपक्रमही विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाने जिल्हाभरात आनंदाचे वातावरण आहे.
सातारा:जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्याच दिवशी कोडोलीत चिमुरड्यांचे ‘जंगी’ स्वागत!
शाळेचा पहिला दिवस म्हटलं की, आई-बाबांचा हात धरून रडत-खडत शाळेच्या पायऱ्या चढणारी मुलं… हे दरवर्षीचे ठरलेले चित्र… मात्र सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली येथे आज या परंपरेला छेद देणारे एक अत्यंत उत्साही आणि अनोखे चित्र पाहायला मिळाले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवख्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या वतीने अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे या चिमुरड्यांना थेट सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पारंपारिक वेशभूषेत बसवून संपूर्ण गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झालेल्या ढोल-ताशांच्या कडकडाटाने संपूर्ण कोडोली गाव दुमदुमून गेले होते. यावेळी मुख्याध्यापक अनिल जाईकर यांनी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी पटवाढीच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. याचाच हा भाग असून अशा राबवलेल्या उपक्रमामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंयं.
