
गावागावात विविध पारंपरिक खेळ, काही धार्मिक प्रथा, मान्यता प्रचलित आहेत. स्थानिक पातळीवरील या कथा जेव्हा ‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना दमदार प्रतिसाद दिला. दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ चित्रपटातील कोकणातील विविध कथा, धार्मिक प्रथा यांवर आधारित वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित झाले. आता कोकणातील शंकासूर आणि त्याचे खेळ यांवर आधारित ‘देवखेळ’ ही वेब सीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतेय. शंकासूर प्रथेचा धागा पकडून अंधश्रद्धेमुळे काय काय घडू शकतं, याची थरारक कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
देवखेळ या वेब सीरिदमध्ये गुहागरमधील देवतळी नावाच्या एका काल्पनिक गावातली कथा दाखवण्यात आली आहे. या गावात विश्वास सरंजामे या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होते. कोकणात पंधरा दिवस शिमगा साजरा होतो, ही बाब सर्वांनाच माहीत आहे. या शिमग्याच्या उत्सवातच शंकासुराचे खेळ असतात. या खेळादरम्यान देवाची पालखी, मिरवणूक, घरोघरी येणारी पालखी.. असा सर्व सोहळा सुरू असतो. कोकणातील शिमगा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो की तिथे उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. परंतु याच शिमग्यात दरवर्षी देवतळी गावात खून होतो. गावात नव्याने नियुक्ती झालेल्या विश्वासकडे या प्रकरणाचा तपास सोपवला जातो.
पंधरा वर्षांपासून देवतळी गावात शिमग्यात खूनाचं सत्र सुरू असतं. अखेर हे सत्र गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा विषय ठरतो, कारण दरवर्षी शिमग्याला गावातील पापी माणसाची हत्या होते आणि शंकासूर त्याला शिक्षा देतो, असा समज गावकऱ्यांमध्ये निर्माण होतो. याचा तपास करण्यासाठी विश्वास कसा सापळा रचतो, या प्रकरणाच्या मुळाशी तो कसा पोहोचतो, या प्रश्नांची उत्तरं सीरिजमध्ये मिळतात.
श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ अत्यंत रहस्यमयी पद्धतीने यात साकारण्यात आला आहे. शंकासूर हा असूर म्हणजेच राक्षस असला तरी कोकणात त्याची देवरुपात पूजा होते. पाप करणाऱ्यांना, अन्याय करणाऱ्यांना तो शिक्षा देतो. अशी मान्यता आहे. याच मान्यतेचा धागा पकडत अत्यंत रंजक पद्धतीने या सीरिजची कथा गुंफण्यात आली आहे. कथा कोकणातली असल्याने तिथलं सौंदर्य साहजिकच लक्ष वेधून घेतं. अंकुश चौधरीने यामध्ये विश्वासची भूमिका अत्यंत चोख साकारली आहे. तर प्राजक्ता माळीनेही तिच्या भूमिकेला न्याय दिला आहे. तरी तिच्या भूमिकेला अजून वाव मिळायला पाहिजे होता, ही गोष्ट सीरिज पाहताना जाणवते. याशिवाय सीरिजमध्ये मंगेश देसाई, वीणा जामकर, यतीन कार्येकर आणि ‘गाव गाता गजाली’ फेम रोहन सुर्वे यांच्याही भूमिका आहेत.