केसांची बट कापून जमिनीत पुरली, माझ्यावर काळी जादू..; ‘सीआयडी’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने काळ्या जादूविषयी धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर काहींनी तिच्यावर टीका केली. आता त्याच अभिनेत्रीने ट्रोलिंगवर स्पष्टीकरण दिलं आहे.

केसांची बट कापून जमिनीत पुरली, माझ्यावर काळी जादू..; सीआयडी फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अभिनेत्री जसवीर कौर
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 15, 2026 | 9:08 AM

जसवीर कौर ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘अनुपमा’ या गाजलेल्या मालिकेत अनुपमाची मैत्रीण देविकाची भूमिका साकारली होती. त्याआधीही तिने ‘सीआयडी’सारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलंय. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जसवीर तिच्या आयुष्यातील काही अशा घडामोडींविषयी व्यक्त झाली, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. माझे केस कापून माझ्यावर काळी जादू करण्यात आली, असा दावा जसवीरने या मुलाखतीत केला आहे. शुभोजीत घोषच्या पॉडकास्ट मुलाखतीत जसवीर म्हणाली, “माझे केस कापून जमिनीत पुरलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझे केस विंचरत होती, तेव्हा एक पूर्ण पॅच गायब असल्याचं दिसलं. हा काही छोटा भाग नव्हता. केसांची एक मोठी बटच कापलेली दिसत होती. त्यानंतर माझ्या भावाला एका महिलेनं सांगितलं की तुझ्या बहिणीचे केस कापून जमिनीत पुरले आहेत. त्याला याविषयी काहीच माहित नव्हतं, तरी त्या महिलेनं अचानक त्याला असं सांगितलं. ही काळी जादू होती.”

या मुलाखतीत जसवीरने दोन वर्षे ‘सीआयडी’ मालिकेत काम केल्यानंतर अचानक एकेदिवशी तिला काढून टाकल्याचा खुलासा केला. तिच्या या मुलाखतीची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली आणि काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलिंगनंतर अखेर जसवीरने स्पष्टीकरण दिलं आहे. “मी नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत माझ्या आयुष्याबद्दल जे काही सांगितलं, त्याला नकारात्मक पद्धतीने दाखवलं जात आहे. जर तुम्ही संपूर्ण पॉडकास्ट मुलाखत पाहिली तर तुम्हाला समजेल की हा विषय अत्यंत सर्वसामान्यच होता. त्यावेळी माझ्यासोबत जे घडलं, तेच मी सांगितलं. माझे केस कापून जमिनीत पुरले होते, माझं काम थांबलं होतं. मी दिवसरात्र फक्त रडत बसायची. माझ्यावर काळी जादू करण्यात आली, असं मला वाटत होतं”, असं ती म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “कोणी नाईलाजास्तव असं करत नाही. कोणाला तरी काढायचं असतं म्हणून मालिकेतून काढून टाकतात. मी आजवर कोणाबद्दल काहीच चुकीचं बोलले नाही. त्यावेळी माझ्यासोबत काळी जादू झाली होती. हे काहीही असू शकतं. जेव्हा मला विचारलं गेलं की कोणीच माझी साथ दिली नव्हती का, तेव्हा मी फक्त मान हलवली. मी कधीच कोणाविषयी तक्रार केली नव्हती. हे सीआयडीबद्दल नाही, हे माझ्याबद्दल आणि माझ्या प्रवासाबद्दल आहे.”

Follow Us