“मी त्यातून बाहेर पडू शकत नव्हतो कारण..”; कठीण काळाविषयी अर्जुन कपूरने सोडलं मौन
'सिंघम अगेन'च्या निमित्ताने अभिनेता अर्जुन कपूरच्या करिअरमध्ये सकारात्मक काळ पुन्हा परतला आहे. गेल्या आठ वर्षांनंतर अर्जुनला हे यश मिळालं आहे. याविषयी तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

अभिनेता अर्जुन कपूरने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. गेल्या आठ वर्षांनंतर त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अर्जुनच्या आयुष्यात हे यश बऱ्याच नकारात्मक टप्प्यांनंतर आलंय. एक वेळ अशीही होती जेव्हा अर्जुनने चित्रपट पाहण्याचंही सोडून दिलं होतं. अर्जुनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या इतर कलाकारांना इंडस्ट्रीत खूप चांगलं यश मिळत होतं. अशा वेळी मला असे ऑफर्स का मिळत नाहीत, असा प्रश्न त्याला पडायचा. या नकारात्मक काळात 2022 मध्ये अर्जुनने चित्रपट बघणंच सोडून दिलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन त्याच्या करिअरमधील त्या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “हे काही रातोरात घडलं नाही. एखादा चित्रपट पूर्ण बघण्याचीही इच्छा माझ्यात नव्हती. मी पाच ते दहा मिनिटं एखादा चित्रपट बघायचो आणि मग मला प्रश्न पडायचा की मला असे ऑफर्स कधी मिळणार? मी इतरांचं काम बघत होतो. मी अशा लोकांपैकी आहे, जो इतरांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांची खुलून प्रशंसा करतो. पण तो काळ असा होता, जेव्हा मला कोणच्याच परफॉर्मन्समध्ये काहीच चांगलं दिसत नव्हतं. मी फक्त हाच विचार करत होतो की, मी असं काम का करू शकत नाही? मला अशा कामाची संधी का मिळत नाही? मला चांगले ऑफर्स मिळत नाहीयेत या विचारांमुळे माझ्या मनात कटुता निर्माण झाली.”
“मी इतरांसोबत माझी तुलना करत नाही. मी असं म्हणत नाही की मी विजय वर्मापेक्षा चांगलं काम करू शकतो. माझं इतकंच म्हणणं आहे की जी भूमिका जयदीप अहलावत साकारत आहे, ती मी का करू शकत नाही? विजय वर्माला सध्या ज्या संधी मिळत आहेत, त्या मला का मिळू शकत नाहीत? या विचारांमुळे मला चित्रपट बघायलाही आवडत नव्हतं. माझं वैयक्तिक ओझं त्यात आड येत होतं. मी दररोज रात्री एक किंवा दोन चित्रपट बघून झोपायचो. पण या नकारात्मकतेमुळे मी 2022 च्या अखेरीस चित्रपट, सीरिज बघणंच सोडून दिलं होतं. मला त्यातून आनंदच मिळत नव्हता. मी बेडवर युट्यूब शॉट्स आणि इन्स्टाग्राम रिल्स बघत झोपून जायचो. मी माझ्याच नकारात्मक विचारांमधून बाहेर पडू शकत नव्हतो. मी खूप अतिविचार करू लागलो होतो”, अशा शब्दांत अर्जुन व्यक्त झाला.
अखेर अर्जुनने थेरपी सुरू केली. स्वत:वर पुन्हा प्रेम करण्याची गरज असल्याचं त्याला या थेरपीतून समजलं होतं. याविषयी तो पुढे म्हणाला, “कधी कधी तुमच्या प्रश्नांची उत्तरं बाहेर शोधायची नसतात, ती तुमच्यातच असतात. मलाही माझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यातच शोधायची होती. मी माझ्या वैयक्तिक गोंधळामुळेच अधू झालो होतो. आयुष्यातील त्या कठीण काळातून बाहेर पडण्यात सिंघम अगेन या चित्रपटाची खूप मदत झाली. मला चित्रपटाच्या सेटवर घरासारखं वातावरण जाणवू लागलं होतं. मला काम मिळत नव्हतं आणि रोहित सरांनी ही संधी दिली. सिंघम अगेनमधील खलनायकी भूमिका साकारताना मला खूप मजा आली.”