रितेश नाही तर मराठीतील हे दोन दिग्गज करणार होते ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन, पण..
Raja Shivaji : रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी दोघांसोबत हातमिळवणी केली होती. पण काही गोष्टींमुळे त्यांच्यासोबत रितेशला काम करता आलं नाही. अखेर त्यानेच 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता रितेश देशमुखने ‘वेड’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या चार वर्षांनंतर त्याने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं. या चित्रपटाला सध्या थिएटरमध्ये दमदार प्रतिसाद मिळतोय. यात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकासुद्धा साकारली आहे. परंतु ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश करणार, हे आधीपासूनच निश्चित नव्हतं. जेव्हा त्याने या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या दिग्दर्शकांना विचारणा केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द रितेशनेच याचा खुलासा केला आहे.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, “2022 मध्ये ‘वेड’ हा चित्रपट पूर्ण केल्यानंतर जिनिलियाने मला विचारलं की, तू या (राजा शिवाजी) चित्रपटाचं दिग्दर्शन का करत नाहीस? पण त्याबद्दल मलाच खात्री नव्हती. कारण ही खूप मोठी जबाबदारी होती. अशा चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची ताकद किंवा मानसिक तयारी माझी होती, असं मला वाटत नव्हतं. तेव्हा तिने मला स्क्रिप्टवर काही वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता. चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी जवळपास एक वर्ष किंवा त्याहून थोडा अधिक काळ लागला. हळूहळू आम्ही ज्या मटेरियलवर काम करत होतो, त्याबद्दल मला आत्मविश्वास जाणवू लागला होता.”
‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी रितेश गेल्या दहा वर्षांपासून काम करत होते. दिग्दर्शनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेण्याआधी त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या दिग्दर्शकांकडे विचारणा केली होती. याविषयी त्याने पुढे सांगितलं, “2016 मध्ये आधी माझे मित्र आणि दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत या चित्रपटाची घोषणा झाली होती. त्यावेळी ते दिग्दर्शन करणार होते. दुर्दैवाने काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि तो चित्रपट रखडला. तीन वर्षांनंतर 2019 मध्ये नागराज मंजुळे यांच्यासोबत मी ‘राजा शिवाजी’ चित्रपट बनवण्यासाठी हातमिळवणी केली. तेव्हासुद्धा आम्ही घोषणा केली, पण नेमका कोविड आला. त्यानंतर काही वर्षे अशीच गेली आणि काहीच काम झालं नाही.”
अखेर रितेशने या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचं ठरवलं. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, भाग्यश्री, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत.