RCB vs KKR : कोलकाता सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, आरसीबीचा गेम करणार?
RCB vs KKR, IPL 2026 Preview : रॉयल चॅलेंजर्स प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. तर केकेआरचं आव्हानही कायम आहे. त्यामुळे 13 मे आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणता संघ यशस्वी ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 57 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमसमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे. आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर केकेआरला तुलनेत प्लेऑफची संधी कमी आहे. मात्र केकेआरचं स्पर्धेतील आव्हान कायम आहे. केकेआरने या हंगामात पहिल्या 6 पैकी 5 सामने गमावले. मात्र त्यानंतर केकेआरने जोरदार कमबॅक करत सलग 4 सामने जिंकले. त्यामुळे आता केकेआर 13 मे रोजी सलग आणि एकूण पाचवा सामना जिंकून आरसीबीचा गेम बिघडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केकेआरचं जोरदार कमबॅक
केकेआरचा मोसमातील पहिल्या सलग 2 सामन्यांत पराभव झाला. त्यानंतर पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यानंतर केकेआरने सलग 3 सामने गमावले. त्यामुळे आता केकेआरचं आव्हान संपुष्टात आल्याचं चित्र होतं. मात्र केकेआरने ड्रीम कमबॅक केलं. केकेआरने राजस्थान, लखनौ, हैदराबाद आणि दिल्लीला पराभूत केलंय.
केकेआरने लखनौवर सुपर ओव्हरमध्ये मात करुन 2 गुणांची कमाई केलीय. त्यामुळे केकेआरचा विश्वास दुणावलेला आहे. तसेच केकेआरने उर्वरित 4 सामने जिकंले तर त्यांचे एकूण 17 गुण होतील. ताज्या आकडेवारीनुसार, केकेआरच्या खात्यात 1O सामन्यांनंतर 9 गुण आहेत. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.
आरसीबी प्लेऑफच्या उंबरठ्यावर
तर दुसऱ्या बाजूला आरसीबीने 11 पैकी 7 सामने जिंकलेत. तर आरसीबीला 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. आरसीबीने सलग 2 पराभवानंतर गेल्या सामन्यात 10 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. आरसीबीचे यासह एकूण 14 गुण झाले आहेत. त्यामुळे आरसीबीचा बुधवारी केकेआर विरुद्ध विजय मिळवून प्लेऑफमधील स्थान सुरक्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र आता त्यात आरसीबी किती यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केकेआर आरसीबीवर वरचढ
दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एकूण 36 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने या 36 पैकी सर्वाधिक 20 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 15 सामन्यांत पलटवार करत केकेआरला पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे आता उभयंघात होणाऱ्या 37 व्या सामन्यात कोण मैदान मारतो आणि 2 गुणांची कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
