‘चोली के पीछे’च्या आधी या गाण्यावर दूरदर्शनने घातली होती बंदी, आजही त्या गाण्याशिवाय होत नाही पार्टी, आहे प्रचंड लोकप्रिय

सध्या अनेक गाणी वादग्रस्त ठरत आहेत. पण चोली के पीछे क्या है या गाण्याआधी देखील एका प्रचंड सुपरहिट गाण्यावर दूरदर्शनने बंदी घातली होती. कोणतं आहे ते गाणं?

चोली के पीछेच्या आधी या गाण्यावर दूरदर्शनने घातली होती बंदी, आजही त्या गाण्याशिवाय होत नाही पार्टी, आहे प्रचंड लोकप्रिय
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 19, 2026 | 2:43 PM

Bollywood Song : आजच्या घडीला चित्रपटसृष्टीत अश्लील शब्द आणि बोल्ड इशाऱ्यांमुळे गाणी सतत चर्चेत येत आहेत. अलीकडे बादशाहचे ‘टटीरी’ तसेच नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित ‘सरके चुनर’ हे गाणं वादात सापडलं आहे. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर काही प्लॅटफॉर्मवरून हे गाणं हटवण्यात आलं आहे. मात्र अशा प्रकारचे वाद हिंदी सिनेमासाठी नवीन नाहीत.

याच पार्श्वभूमीवर 1971 साली प्रदर्शित झालेल्या ‘हरे राम हरे कृष्ण’ या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणं आजही वादग्रस्त गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. देव आनंद, झीनत अमान आणि मुमताज यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील हे गाणं रिलीज होताच मोठ्या वादात सापडले होते.

आशा भोसले यांच्या आवाजात सादर झालेले ‘दम मारो दम’ हे गाणं संगीतकार राहुल देव बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांच्या जोडीने तयार केले होते. गाण्यात जीनत अमान स्टाईलमध्ये चिलम ओढताना दाखवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या गाण्यावर नशेचे आरोप झाले. अनेकांनी हे गाणे भारतीय संस्कृतीविरोधी असल्याचे आणि तरुणांमध्ये नशेची प्रवृत्ती वाढवणारे असल्याचे म्हटले.

मात्र या चित्रपटाची मूळ कथा त्या काळात वाढत असलेल्या हिप्पी संस्कृती आणि ड्रग्सच्या व्यसनावर टीका करणारी होती. कथेनुसार, देव आनंद यांनी साकारलेला प्रशांत हा आपल्या हरवलेल्या बहिणीचा शोध घेत काठमांडूला पोहोचतो. तिथे त्याची बहीण जीनत अमान पूर्णपणे हिप्पी जीवनशैलीत अडकलेली असते आणि नशेच्या आहारी गेलेली दाखवली आहे. त्यामुळे चित्रपटाचा हेतू नकारात्मक परिणाम दाखवण्याचा असला तरी गाण्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला.

‘दम मारो दम’ गाणं

या वादाचे पडसाद इतके तीव्र होते की All India Radio ने या गाण्यावर बंदी घातली होती. तसेच दूरदर्शनवर चित्रपट प्रसारित करताना ‘दम मारो दम’ गाणे पूर्णपणे काढून टाकण्यात आले होते.

विशेष म्हणजे, इतक्या वादानंतरही या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आशा भोसले यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कारही मिळाला. दिग्दर्शक देव आनंद यांनी हे गाणं अँटी-ड्रग संदेशासाठी वापरले असले तरी त्याची धून आणि बोल्ड सादरीकरणामुळे ते वेगळ्याच कारणांसाठी प्रसिद्ध झाले.

आजच्या काळातील वादग्रस्त गाण्यांप्रमाणेच ‘दम मारो दम’ हे गाणेही त्या काळात मोठ्या चर्चेचा विषय ठरले होते आणि आजही ते हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक गाजलेले पण वादग्रस्त गाणे म्हणून ओळखले जाते.

Follow Us