चित्रपट असावा तर असा, ज्याचा शेवट पाहून थिएटरमध्ये रडलेले लोक, अनेकांनी केलेली आत्महत्या
लव्ह स्टोरी असावी तर अशी, ज्याचा शेवट पाहून अनेकांनी केली होती आत्महत्या. चित्रपट ठरला होता प्रचंड सुपरहिट. आजही प्रेक्षक कुटुंबासोबत वेळ काढून बघतात.

1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीत अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. त्या काळात बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांना वेगळाच भावनिक धक्का दिला. दु:खान्त शेवट असलेल्या या प्रेमकथेनं केवळ बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवलं नाही तर समाजावरही खोल परिणाम केला होता.
अनेक प्रेमी युगुलांनी या चित्रपटातून प्रेरणा घेत आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतल्याच्या घटनाही त्या काळात समोर आल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक कैलासम बालचंद्र यांनी केले होते. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत अनेकांनी बालाचंदर यांना शेवट बदलण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी आपल्या मूळ कथेशी प्रामाणिक राहत शेवटामध्ये कोणताही बदल केला नाही. हाच निर्णय पुढे चित्रपटाच्या यशाचं मोठं कारण ठरला.
लग्नासाठी कुटुंबीयांची अट
चित्रपटात कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. गोव्यात राहणारा तमिळ तरुण वासू आणि उत्तर भारतीय मुलगी सपना यांच्या प्रेमकथेभोवती चित्रपट फिरतो. भाषा, संस्कृती आणि कुटुंबीयांचा विरोध या सगळ्या अडथळ्यांमुळे त्यांचं प्रेम सतत संघर्ष करत राहतं.
वासूला हिंदी भाषा समजत नसते तर सपनाचं कुटुंब दक्षिण भारतीय संस्कृतीकडे कमीपणाने पाहत असतं. सुरुवातीला सतत भांडणाऱ्या या दोन शेजाऱ्यांमध्ये हळूहळू प्रेम निर्माण होतं. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नसतं. दोघांना वेगळं करण्यासाठी कुटुंबीय एक अट घालतात. वर्षभर एकमेकांपासून दूर राहायचं. त्यानंतरही जर त्यांचं प्रेम कायम असेल तर लग्नाला परवानगी दिली जाईल.
चित्रपटाचा शेवट ठरला खास
या अटीमुळे वासू हैदराबादला निघून जातो. त्या काळात तो हिंदी भाषा शिकतो आणि सपनासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. मात्र या दरम्यान सपनाच्या आयुष्यात अनेक दुर्दैवी घटना घडतात. तिच्यावर अत्याचारासारखी अमानुष घटना ओढवते. अखेर सर्व संकटांनी खचलेले वासू आणि सपना एकत्र जगणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यावर कड्यावरून उडी मारून आत्महत्या करतात. या दु:खद शेवटाने प्रेक्षक हादरून गेले होते.
या चित्रपटाने त्या वर्षी तब्बल तीन फिल्मफेअर पुरस्कार जिंकले होते. भावनिक कथा, प्रभावी अभिनय, हृदयस्पर्शी संगीत आणि धाडसी शेवट यामुळे हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील एक अजरामर प्रेमकथा म्हणून आजही ओळखला जातो.