Atul Kulkarni: अतुल कुलकर्णीने अवघ्या 15 दिवसांत लिहिली ‘लाल सिंग चड्ढा’ची पटकथा; मात्र आमिरने 2 वर्षांपर्यंत वाचण्यास दिला होता नकार

| Updated on: Aug 07, 2022 | 11:12 AM

आमिर खानच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचं पटकथालेखन अतुलने केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुलने या चित्रपटाच्या प्रवासाविषयी सांगितलं.

Atul Kulkarni: अतुल कुलकर्णीने अवघ्या 15 दिवसांत लिहिली लाल सिंग चड्ढाची पटकथा; मात्र आमिरने 2 वर्षांपर्यंत वाचण्यास दिला होता नकार
Atul Kulkarni: अतुल कुलकर्णीने अवघ्या 15 दिवसांत लिहिली 'लाल सिंग चड्ढा'ची पटकथा
Image Credit source: Instagram
Follow us on

1994 मध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ‘फॉरेस्ट गम्प’ (Forest Gump) या चित्रपटाचं वर्णन खरी अमेरिकी कथा असं केलं जातं. या चित्रपटात फक्त एका व्यक्तीची कथा नाही तर त्यासोबत देशाचा प्रवासही दाखवण्यात आला. त्यामुळे दुसऱ्या देशावर आधारित त्याचा रिमेक बनवणं म्हणजे थोडं आव्हानात्मकच होतं. पण मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) ते करून दाखवलं. आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा(Laal Singh Chaddha) या चित्रपटाचं पटकथालेखन अतुलने केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुलने या चित्रपटाच्या प्रवासाविषयी सांगितलं. अतुलने अवघ्या 10-15 दिवसांत या चित्रपटाची कथा लिहिली होती, मात्र त्यानंतर आमिरने (Aamir Khan) जवळपास दोन वर्षे ती कथा वाचलीच नव्हती.

रिमेकची कल्पना कशी सुचली?

फॉरेस्ट गम्पचा हिंदी रिमेक बनवण्याची कल्पना 2008 मध्ये अतुलला सुचली होती. आमिरची निर्मिती असलेल्या ‘जाने तू.. या जाने या’ या चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर जे काही घडलं त्याविषयी अतुलने या मुलाखतीत सांगितलं. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अतुल म्हणाला, “चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर आम्ही आमिरच्या घरी गेलो होतो. रात्री जेवताना गप्पांदरम्यान आवडत्या चित्रपटांचा विषय निघाला. त्यावेळी आमच्या दोघांच्या तोंडून एकच नाव निघालं. ते म्हणजे फॉरेस्ट गम्प. दुसऱ्या दिवशी मी 10-15 दिवसांच्या शूटिंग शेड्युलला निघणार होतो. मात्र ते शूटिंग ऐनवेळी रद्द झालं. त्यादिवशी माझ्या घरी मला फॉरेस्ट गम्पची डीव्हीडी दिसली आणि मोकळा वेळ असल्याने मी पुन्हा तो चित्रपट पाहायचा ठरवलं. काही वेळाने माझ्या मनात विचार आला की ही घटना भारतात घडली असती तर? विचार करत असतानाच मी नोट्स लिहायला सुरुवात केली. जवळपास एक तास चित्रपट पाहिल्यानंतर मी पटकथा लिहिण्याचा विचार केला.”

15 दिवसांत लिहिली पटकथा

शूटिंग रद्द झाल्यामुळे अतुलला 10-15 दिवसांचा मोकळा वेळ मिळाला होता आणि त्याच वेळेत 10 दिवसांत त्याने ‘लाल सिंग चड्ढा’ची पटकथा लिहिली होती. “10 दिवसांनंतर मला लक्षात आलं की संपूर्ण कथा लिहिली आहे. त्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत मी दुसरा ड्राफ्ट लिहिला. दोन कलाकारांमध्ये सहजच झालेल्या चर्चेनंतर या सर्व गोष्टीला सुरुवात झाली होती”, असं अतुलने सांगितलं. पण खरा संघर्ष इथून सुरू झाला. अतुलने जेव्हा आमिरला कथा वाचण्यास सांगितलं, तेव्हा त्याने वेळच दिला नाही.

हे सुद्धा वाचा

दोन वर्षे आमिरने वाचलीच नाही कथा

“जवळपास दोन वर्षांपर्यंत आमिरने ती कथा वाचलीच नव्हती. त्यादरम्यान आम्ही भेटत नव्हतो किंवा संपर्कात नव्हतो असं काही नव्हतं. पण नेहमी तो म्हणायचा की, हो वाचतो. अखेर एके दिवशी मी त्याला थेट विचारलं तेव्हा तो म्हणाला, तू लेखक नाहीस आणि तू मला सांगितलंस की तू 15 दिवसांत फॉरेस्ट गम्पच्या रिमेकची कथा लिहिलीस. तू माझा जवळचा मित्र आहेस आणि तू पटकथा चांगली लिहिली नाहीस असं सांगून तुला दुखवायचं नव्हतं. त्यामुळे त्याने पटकथा वाचली नव्हती.”

चित्रपटाचे हक्क मिळवण्यास लागली 10 वर्षे

पटकथा वाचल्यावर न आवडल्यास ती कचऱ्यात फेकून दिली तरी चालेल असं म्हणत अखेर अतुलने आमिरला आग्रह केला. मात्र ती वाचल्यावर आमिरला कथा इतकी आवडली की त्याने अभिनयासोबतच निर्मितीचाही निर्णय घेतला. पण हा प्रवास इथेही संपत नाही. कारण अतुलची पुढील दहा वर्षे ही पॅरामाऊंट पिक्चर्सकडून फॉरेस्ट गम्पचे अधिकृत हक्क विकत घेण्यात गेली.

आमिरचा पंजाबी लूक

आमिरचा लाल सिंग चड्ढामधील लूक हा चर्चेचा विषय ठरला आहे. लांब दाढी आणि पारंपारिक शीख पगडीमधील त्याच्या या लूकमागे काय विचार होता असं विचारलं असता अतुल म्हणाला, “यावर बोलण्यासारखं बरंच काही आहे, परंतु मी त्यावर अधिक माहिती सध्या देऊ शकत नाही. मात्र मी हे निश्चितपणे सांगू शकतो की चित्रपटातील प्रत्येक छोट्या गोष्टीमागे काहीतरी कारण दडलेलं आहे.”

फॉरेस्ट गम्प पाहिलेल्यांनी लाल सिंग चड्ढा का पाहावा?

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गम्प या चित्रपटाने जगभरात लोकप्रियता मिळवली. पिढ्यानपिढ्या लाखो लोकांनी तो पाहिला आहे, ज्यात भारतातील अनेकांचाही समावेश आहे. मग अशा प्रेक्षकांनी लाल सिंग चड्ढा का पाहावा असा प्रश्न विचारल्यावर अतुल म्हणाला “खरं तर, यात नवीन काय नाही ते शोधण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा संपूर्णपणे देशी कौटुंबिक चित्रपट आहे. ज्यांनी फॉरेस्ट गम्प पाहिला आहे त्यांना माहित असेल की या चित्रपटाचा रिमेक करणं अशक्य आहे. मी फक्त पटकथेचं रुपांतर हिंदीत केलं आहे. पण या दोन्ही चित्रपटांमध्ये काहीही साम्य असू शकत नाही कारण अमेरिकेचा कोणताही संदर्भ भारतासाठी लागू करता येणार नाही. यातील पात्रांशिवाय साम्यता कशातच नाही. अत्यंत निष्पाप माणसाचा प्रवास.. हाच या चित्रपटाचा आत्मा आहे.”

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. आमिर खान प्रॉडक्शन्स, किरण राव आणि वायकॉल 18 स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.