‘लायगर’च्या दिग्दर्शकाने मुंबईतून गाशा गुंडाळला; चित्रपट फ्लॉप झाल्याने बसला फटका

| Updated on: Sep 08, 2022 | 3:07 PM

चित्रपट फारशी कमाई करू न शकल्याने निर्मात्यांना आर्थिक फटका बसल्याचं कळतंय. यामुळे लायगरचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) यांना त्यांचं मुंबईतलं घर सोडून जावं लागतंय. मायानगरी मुंबईला सोडून ते पुन्हा हैदराबादला रवाना होत असल्याचं समजतंय.

लायगरच्या दिग्दर्शकाने मुंबईतून गाशा गुंडाळला; चित्रपट फ्लॉप झाल्याने बसला फटका
'लायगर'च्या दिग्दर्शकाने मुंबईतून गाशा गुंडाळला
Image Credit source: Instagram
Follow us on

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda) ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. तर अनन्या पांडेनंसुद्धा या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. चित्रपट फारशी कमाई करू न शकल्याने निर्मात्यांना आर्थिक फटका बसल्याचं कळतंय. यामुळे लायगरचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) यांना त्यांचं मुंबईतलं घर सोडून जावं लागतंय. मायानगरी मुंबईला सोडून ते पुन्हा हैदराबादला रवाना होत असल्याचं समजतंय.

पुरी जगन्नाथ हे मुंबईतील घर सोडण्याच्या तयारीत आहेत. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ते पुन्हा हैदराबादला जाणार आहेत. ते मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या आलिशान घरात राहत होते. या घरासाठी त्यांनी दर महिना तब्बल दहा लाख रुपये भाडं द्यावं लागत होतं. याशिवाय त्याची मेन्टेनन्स फीज सुद्धा भरावी लागत होती. हैदराबादमध्ये ज्युबिली हिल्स परिसरात त्यांचा बंगला आहे. ते असताना मुंबईत राहण्यासाठी इतके पैसे खर्च करणं त्यांना परवडत नाहीये.

लायगर फ्लॉप झाल्यानंतर पुरी जगन्नाथ यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा आगामी ‘जन गण मन’ हा चित्रपट सुद्धा सुरू होण्याआधीच बंद झाला आहे. यामध्येही विजय देवरकोंडा मुख्य भूमिका साकारणार होता. लायगरच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती. मात्र लायगरची वाईट परिस्थिती पाहून आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘लायगर’ अपेक्षित कमाई करू न शकल्याने विजय त्याच्या खिशातून निर्मात्यांना 6 कोटी रुपये परत करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. या चित्रपटासाठी विजयने तगडं मानधन घेतलं होतं. बॉलिवूडचा हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला नुकसान सहन करावा लागत आहे.

विजय लवकरच ‘खुशी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. विजय आणि समंथाशिवाय या चित्रपटात वेन्नेला किशोर, राहुल रामकृष्ण, मुरली शर्मा आणि सचिन खेडेकर यांच्याही भूमिका आहेत.