Sonu Sood: चार पाय, चार हात असलेल्या चौमुखीचं आयुष्य बदललं; सोनू सूदने केली मोठी मदत

चौमुखीचा जन्म झाला तेव्हा तिला चार पाय आणि चार हात होते. तिच्या शस्त्रक्रियेसाठी सोनूने मदत केली असून सोशल मीडियाद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली. सोनूने चौमुखीसोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

Sonu Sood: चार पाय, चार हात असलेल्या चौमुखीचं आयुष्य बदललं; सोनू सूदने केली मोठी मदत
Sonu Sood with Chaumukhi Kumari.
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 3:18 PM

लॉकडाऊनदरम्यान असंख्य स्थलांतरित मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) जणू ‘देवदूत’ बनून त्यांच्या मदतीला धावून गेला होता. लॉकडाउननंतरही त्याने लोकांना विविध प्रकारची मदत केली. कधी कोणाला अभ्यासासाठी तर कधी कोणाला उपचारासाठी त्याने ही मदत केली. आता सोनू सूदने बिहारमधल्या (Bihar girl) चौमुखी कुमारी (Chaumukhi Kumari) या चिमुकल्या मुलीची मोठी मदत केली आहे. चौमुखीचा जन्म झाला तेव्हा तिला चार पाय आणि चार हात होते. तिच्या शस्त्रक्रियेसाठी सोनूने मदत केली असून सोशल मीडियाद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली. सोनूने चौमुखीसोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. आता चौमुखी इतरांप्रमाणे सर्वसामान्य मुलीचं आयुष्य जगू शकेल.

चौमुखीचा सर्जरीपूर्वीचा आणि नंतरचा फोटो पोस्ट करत सोनूने लिहिलं, ‘माझा आणि चौमुखी कुमारीचा हा प्रवास यशस्वी ठरला. बिहारमधील एका छोट्याशा गावात चौमुखीचा जन्म झाला, तेव्हा तिला चार पाय आणि चार हात होते. आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती तिच्या घरी सुखरुप परतण्यासाठी सज्ज झाली आहे.’ ‘न्यूज एनसीआर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनूने चौमुखीला शस्त्रक्रियेसाठी सूरतला पाठवलं होतं. बुधवारी जवळपास सात तास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

पहा फोटो-

सोनू सूदच्या या पोस्टवर सुनील शेट्टी, पूजा बत्रा, रिधिमा पंडित, इशा गुप्ता यांसारख्या कलाकारांनी कमेंट करत प्रशंसा केली आहे. ‘या पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट माणूस’, अशी कमेंट एका युजरने लिहिली. तर ‘गरीबांचा मसिहा’ असं दुसऱ्याने म्हटलं. ‘तुमच्यासारखे लोक खूप कमी असतात सर, देव तुम्हाला नेहमी खूश ठेवो’, असंही नेटकऱ्याने लिहिलं.

सोनू सूद सध्या एमटीव्हीच्या ‘रोडीज’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतोय. 8 एप्रिल रोजी या नवीन सिझनचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. याशिवाय त्याने ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात राजकवी चांद बराई यांची भूमिका साकारली. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्याही भूमिका आहेत.