‘छत्रपती संभाजी’मध्ये दलिप ताहिल साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

| Updated on: Jan 15, 2024 | 3:49 PM

स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. या महान योद्धयाचा इतिहास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

छत्रपती संभाजीमध्ये दलिप ताहिल साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Dalip Tahil
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 15 जानेवारी 2024 | अभिनेता दलिप ताहिल हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या 26 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून मुघल सल्तनतीपुढे हजर करेन अशी प्रतिज्ञा करणारा मुघल सरदार मुकर्रब खान हा औरंगजेबाचा नातेवाईक. शेख निजाम अर्थात मुकर्रब खानाने संभाजी राजांना कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केलं. त्याबद्दल त्याला मुघल दरबारात मोठा मान मिळाला.

या भूमिकेविषयी बोलताना दलिप ताहिल म्हणाले, “‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी मला ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील क्रूर मुकर्रब खानची भूमिका करणं माझ्यासाठी आव्हानात्मक आणि वेगळा अनुभव होता.” राकेश सुबेसिंह दुलगज यांनी ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये 26 जानेवारीला एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के, अमित देशमुख, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे यांच्या भूमिका आहेत. ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवलं आणि वाढविलं. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.