
सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत ‘धुरंधर’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज असली तरी प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसह इतरही कलाकारांच्या यात भूमिका आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी इतक्या मोठ्या प्रमाणावर होतेय, की त्यामुळे आपोआप प्रेक्षक ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर इतके पोस्ट, रील्स, व्हिडीओ, मीम्स पाहिल्यानंतर FOMO म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ जाणवू लागल्यानेही (एखादी गोष्ट सर्वजण करत असतील तर आपण त्यात मागे राहतोय अशी भावना मनात निर्माण होणं) अनेकजण ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. ‘धुरंधर’ने जगभरातील प्रेक्षकांना मोहीत केलं आहे. राजकारण, गुन्हेगारी, सत्तेची धोकादायक जुगलबंदी, रेहमान डकैतची दहशत या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरला...