
सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत ‘धुरंधर’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज असली तरी प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांसह इतरही कलाकारांच्या यात भूमिका आहेत. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी इतक्या मोठ्या प्रमाणावर होतेय, की त्यामुळे आपोआप प्रेक्षक ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर इतके पोस्ट, रील्स, व्हिडीओ, मीम्स पाहिल्यानंतर FOMO म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ जाणवू लागल्यानेही (एखादी गोष्ट सर्वजण करत असतील तर आपण त्यात मागे राहतोय अशी भावना मनात निर्माण होणं) अनेकजण ‘धुरंधर’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. ‘धुरंधर’ने जगभरातील प्रेक्षकांना मोहीत केलं आहे.
राजकारण, गुन्हेगारी, सत्तेची धोकादायक जुगलबंदी, रेहमान डकैतची दहशत या सर्व गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे, त्यातील संवाद वजनदार आहेत, चित्रपटाची गती उत्कृष्ट आहे, ज्यामुळे कोणत्याही किरकोळ त्रुटी सहज दिसून येत नाहीत. तरीही काही चाणाक्ष प्रेक्षकांनी चित्रपटील त्रुटी हेरल्या आणि सोशल मीडियाद्वारे त्या लक्षात आणून दिल्या आहेत. चित्रपटातील यलिना, हमजा, जमील जमाली यांसारख्या प्रमुख पात्रांशी संबंधित या चुका आहेत. या चुका पाहून तुम्हीसुद्धा डोक्याला हात लावाल.
एका एक्स (ट्विटर) युजरने ही चूक दाखवून दिली. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे यलिना हमजावर प्रेम करते आणि स्वेच्छेने त्याच्यासोबत राहू लागते. तिचे वडील जमील जमाली यांना याबद्दलची जाणीवच नसते. जेव्हा यलिना अनेक दिवस घरी परतत नाही तेव्हा जमीलला समजतं की तिच्या मुलीचं अपहरण झालं आहे. इथेच प्रेक्षकांनी मोठी चूक हेरली. प्रेक्षकांच्या मते अशा परिस्थितीत कोणताही पिता आकाशपाताळ एक करतो. मग जमील तर देशाच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती दाखवला आहे, जो खासदार असतो, त्याची पोहोच आणि ताकद वारंवार दाखवली गेली आहे, तरीसुद्धा मुलगी गायब झाल्याचं समजल्यावर तो शांतपणे त्याचा स्वीकार करतो. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही.
One thing I didn’t understand in Dhurandhar was
Yalina was in love with Hamza, but Jameel Jalali (her father) had no idea about it, when she started living with Hamza, Jameel believed she had been kidnapped
From his point of view his daughter was missing for several days. Yet… pic.twitter.com/8kuGTkFswt
— PrinCe (@Prince8bx) December 15, 2025
जर एखाद्या वरिष्ठ राजकीय व्यक्तीची मुलगी गायब झाली असेल तर त्यावरून हंगामा, गोंधळ होणं साहजिक आहे. पोलीस यंत्रणा, मीडिया सर्वजण त्याकडे लक्ष वेधतात. परंतु ‘धुरंधर’मध्ये असं काहीच होताना दिसत नाही. यलिनाला शोधायला कोणतंही मोठं सर्च ऑपरेशन होत नाही किंवा जमीलकडून कोणतं मोठं पाऊल उचललं जात नाही. त्यामुळे कथा कितीही दमदार असली तरी त्यातही ही गोष्ट प्रेक्षकांना खटकली आहे.
चित्रपटातील एका दृश्यात क्लबमध्ये पार्टी सुरू असते. यलिना (सारा अर्जुन) या पार्टीत असते, तेव्हा हमजा (रणवीर सिंह) स्थानिक पोलीस अधिक्षकांना (एसपी) फोन करतो आणि त्यांना सूचना देतो की तिथे पार्टी सुरू आहे आणि त्यांनी तिथे छापा टाकावा. जेव्हा त्या क्लबमध्ये पोलीस छापा टाकतात तेव्हा सर्वजण पळू लागतात. अशातच रणवीर साराला त्याच्या बाईकवर लिफ्ट देतो. पोलिसांच्या चार-पाच गाड्या तेव्हा रणवीरचा पाठलाग करतात.
या चित्रपटात उजैर नावाचा एक पात्र दुसऱ्या एका दृश्यात हमजाला सांगतो की त्याच्या टोळीचे स्थानिक पोलीस अधिक्षकांशी चांगले संबंध आहेत. याचा अर्थ ज्या टोळीचा हमजा भाग आहे, त्याला एसपींचा पाठिंबा आहे. तरीही पोलीस त्याचा पाठलाग करतात. ही कल्पना समजणंच कठीण आहे. जर त्याच्या टोळीला पोलिसांचा पाठिंबा असेल तर पोलीस त्याला कसं पकडू शकतात, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
Disclaimer : या लेखात काही स्पॉइलर्स (चित्रपटाच्या कथेबाबत कल्पना देणारे) असले तरी संपूर्ण कथेला किंवा चित्रपटाला हानी पोहोचवी, अशी कोणतीही अतिरिक्त माहिती दिलेली नाही.