बॉलिवूड सोडून गावी परतणार होती ‘धुरंधर 2’मधली अभिनेत्री; या कारणामुळे रातोरात पालटलं नशीब
मनासारखं काम न मिळाल्याने बॉलिवूड सोडून गावी परतण्याचा निर्णय या प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला होता. त्यावेळी आईवडिलांनीही तिला 'घरी ये' असं म्हणत पाठिंबा दिला होता. मात्र दोन चित्रपटांनी तिचं नशीब कायमचं पालटलं.

चित्रपटसृष्टीत असे असंख्य कलाकार आहेत, ज्यांचं अभिनयकौशल्य दमदार आहे, परंतु त्यांना मनासारख्या भूमिका किंवा चित्रपट मिळत नाहीत. सातत्याने बरीच वर्षे मेहनत घेऊनही यश न मिळाल्यास अनेकजण माघार घेत इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतात. बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत असंच काहीसं घडलं होतं. मनासारखं काम मिळत नसल्याने तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर एका चित्रपटाच्या ऑफरने तिचं नशीब कायमचं बदललं. त्या अभिनेत्रीला नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून यामी गौतम आहे.
यामी गौतमने बॉलिवूड सोडून हिमाचल प्रदेशातील तिच्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या कुटुंबीयांनीही तिला पाठिंबा दिला होता. पण मग रातोरात तिचं नशीब पालटलं आणि तिने आपला निर्णय मागे घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द यामीनेच याविषयीचा खुलासा केला आहे. “माझा ‘विकी डोनर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊनही लोकांनी त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं नाही. कधीकधी पुढे जाण्याच्या दबावाखाली येऊन मी अशाही भूमिका स्वीकारल्या आहेत, ज्या खरंतर मला करायच्या नव्हत्या”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
या मुलाखतीत यामीने पुढे सांगितलं, “मी एकदा इंडस्ट्री सोडून घरी परतण्याचा विचार केला होता. ‘उरी’ आणि ‘बाला’ या चित्रपटांच्या आधी मी इंडस्ट्री पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी हिमाचलला परत जाईन असं मला वाटलं होतं. तिथे आमची शेतजमीन आहे. मी पूर्णपणे वेगळं आयुष्य सुरू करण्याची कल्पना केली होती. माझ्या आईवडिलांनी मला खूप पाठिंबा दिला. ते फक्त म्हणाले, तू घरी ये. पण ज्याक्षणी मी भीतीपोटी इंडस्ट्रीला चिकटून राहणं सोडलं, त्याक्षणी सर्वकाही बदललं. मला ‘उरी’ आणि ‘बाला’ यांसारख्या चित्रपटांचे ऑफर्स मिळाले. मी भीतीला माझा सर्वांत मोठा शत्रू मानते. ज्यादिवशी मी इंडस्ट्रीतून बाहेर काढलं जाण्याच्या भीतीने ‘हो’ म्हणणं थांबवलं, त्यादिवशी सर्वकाही बदललं.”
यामीला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यामी गेल्या चौदा वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे.