
नरवीर तान्हाज मालुसरे यांनी स्वराज्यासाठी वीरमरण पत्करलं. ‘आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं’ असं म्हणत ते स्वत:च्या पुत्राचं लग्न पुढे ढकलून स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. 2020 मध्ये तान्हाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वावर आधारित ‘तान्हाजी: ज अनसंग वॉरियर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं होतं. अभिनेता शरद केळकरने यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, तर अभिनेता अजय देवगण या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत होता. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सहा वर्षे पूर्म झाली आहेत. यानिमित्त शरद आणि अजय यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिल्या आहेत. अजयने त्याच्या पोस्टमधून ‘तान्हाजी’च्या सीक्वेलविषयी मोठी हिंट दिली आहे.
‘तान्हाजी’ या चित्रपटातील दृश्यांचं अॅनिमेशन पोस्ट करत अजयने लिहिलं, ‘गड आला पण सिंह गेला.’ या पोस्टमध्ये अजयने पुढे असंही म्हटलंय की, ‘पण कथा अजून संपली नाही.’ त्यामुळे या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार की काय, अशा चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. तर अभिनेता शरद केळकरनेही ‘या अद्भुत अनुभवाची सहा वर्षे.. जय भवानी जय शिवाजी’ लिहित खास फोटो पोस्ट केला आहे.
ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची, त्यागाची आणि देशभक्तीची गाथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये अजय देवगणने तान्हाजी मालुसरे यांची तर सैफ अली खानने उदयभान राठोडची भूमिका साकारली होती. यात अजयची रिअल लाइफ पत्नी आणि अभिनेत्री काजोलने रील लाइफ पत्नी म्हणजेच सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली होती. अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कठोर परिश्रम केलं होतं. त्याच्या कारकिर्दीतील ही संस्मरणीय भूमिका ठरली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 350 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक ठरला होता. या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्सचंही विशेष कौतुक झालं होतं. तर उदयभान राठोडच्या भूमिकेत सैफनेही उत्तम काम केलं होतं.