Drishyam 2 Review: ‘दृश्यम 2’मध्ये सस्पेन्सचा जबरदस्त तडका; थक्क करणारा क्लायमॅक्स

| Updated on: Nov 18, 2022 | 3:04 PM

'दृश्यम 2'मध्ये सस्पेन्स-थ्रिलरचा डबल डोस, तिकिट काढण्याआधी एकदा हा रिव्ह्यू वाचाच!

Drishyam 2 Review: दृश्यम 2मध्ये सस्पेन्सचा जबरदस्त तडका; थक्क करणारा क्लायमॅक्स
Drishyam 2
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: “2 अक्तूबर को क्या हुआ था?”, हा प्रश्न सिनेप्रेमींना चांगलाच माहीत असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील हा डायलॉग तुफान गाजला. यावर आजही मीम्स व्हायरल होतात. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पहिल्या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक अवाक् झाले होते. आता पुन्हा एकदा सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस घेऊन ‘दृश्यम 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सीक्वेल कसा आहे, ते जाणून घेऊयात..

कथा

गोव्यात राहणारा विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत 2 ऑक्टोबर रोजी कोणती घटना घडली हे तर तुम्हाला माहीतच असेल. ‘दृश्यम 2’ हा चित्रपट त्याच कथेला सात वर्षे पुढे नेतो. केबल ऑपरेटरपासून हा विजय थेट एका थिएटरचा मालक बनला आहे. त्याला चित्रपटांचं वेड अजूनही आहे आणि त्याचमुळे तो स्वत:च्या एका चित्रपटाची निर्मिती करू इच्छित आहे. चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी तो एका प्रसिद्ध लेखकाची (सौरभ शुक्ला) भेट घेतो. मात्र कथा लिहून झाल्यानंतर तो त्याच्या क्लायमॅक्सवर समाधानी नसतो. म्हणून त्यावर तो पुन्हा एकदा काम करू लागतो.

दुसरीकडे सात वर्षे पूर्ण झाल्यानंतरही विजयचं कुटुंब अजूनही त्या घटनेच्या आठवणीत आणि भीतीत जगत आहे. मोठी मुलगी अंजूला (इशिता दत्ता) पॅनिक अटॅक येत असतात तर पत्नी (श्रिया सरन) नंदिनी सतत पोलिसांना पाहून घाबरते. या सीक्वेलमध्ये आणखी एका रंजक भूमिकेची भर पडली आहे, ती म्हणजे एसपी तरुण अहलावत यांची. ही भूमिका अक्षय खन्नाने साकारली आहे. एसपी तरुण हा मीरा (तब्बू) यांचा मित्र असतो. विजय साळगावकरच्या केसला अक्षय खन्ना पुन्हा उघडतो आणि पोलीस पुन्हा एकदा त्याचा तपास करू लागते.

हे सुद्धा वाचा

पुन्हा क्रिमिनल इन्वेस्टिगेशनमध्ये फसलेलं विजय साळगावकरचं कुटुंब त्यातून वाचणार का, पोलिसांना मृतदेह सापडतो का, पोलीस आणि विजय यांच्यातील या लढ्यात कोणाला यश मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपटात मिळतील.

दिग्दर्शन

निशिकांत कामत यांच्या निधनानंतर अभिषेक पाठक यांनी ‘दृश्यम 2’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दृश्यमच्या प्रचंड यशानंतर लॉकडाऊनमध्ये अनेक सिनेप्रेमींनी या चित्रपटाचा मल्याळम व्हर्जन पाहिला असेल. त्यामुळे हिंदीत नवीन काय दाखवणार याचा दबाव दिग्दर्शकावर साहजिकच होता. मात्र अभिषेक यांनी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांची ही जबाबदारी पूर्ण केली आहे. मल्याळम व्हर्जन पाहिलेल्यांना क्लायमॅक्स जरी आधीच माहित असला तरी संपूर्ण चित्रपट तो प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो.

या चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉगवर तुमच्याकडून आपसूकच टाळी वाजवली जाते. सुरुवातीची 20 मिनिटं थोडी धीम्या गतीने गेली तरी पुढे संपूर्ण चित्रपटाची कथा ही पुढे काय घडणार याची उत्सुकता निर्माण करते. मल्याळम चित्रपटाचा मध्यांतरापूर्वीचा भाग थोडा आणखी दीर्घ खेचला गेलाय. मात्र हिंदीत दिग्दर्शकाचा स्मार्ट प्ले दिसून येतो. या भागाला त्यांनी तितकाच मनोरंजन आणि खुसखुशीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या शेवटपर्यंत सस्पेन्स टिकून राहतो आणि क्लायमॅक्स अक्षरश: थक्क करणारा ठरतो.

या चित्रपटाच्या जमेची बाजू म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड स्कोर. उत्तम बॅकग्राऊंड स्कोरमुळे प्रत्येक सीक्वेन्सवर थ्रिलर निर्माण होतो. सिनेमॅटोग्राफर सुधीर चौधरी यांनी अत्यंत सुंदरपणे गोव्याला एका वेगळ्या नजरेतून दाखवलं आहे.

अभिनय

अजय देवगण आणि तब्बू जेव्हा स्क्रीनवर एकमेकांसमोर येतात, तेव्हा त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. मात्र दृश्यमच्या तुलनेत दृश्यम 2 मध्ये तब्बूचं अभिनय विशेष लक्ष वेधून घेत नाही. मात्र अक्षय खन्ना यात भाव खाऊन जातो. प्रत्येक सीनमध्ये त्याचं दमदार अभिनय पाहायला मिळतं. अक्षय आणि अजय एकमेकांवर भारी पडणार का, असा प्रश्न निर्माण होत असतानाच दोघंही आपापल्या भूमिकेच्या चौकटीनुसार छाप सोडण्यात यशस्वी ठरतात.

श्रिया सरनने तिची भूमिका चांगली साकारली आहे. तर इशिता आणि मृणाल यांचा आत्मविश्वास स्क्रीनवर झळकतो. इन्स्पेक्टर गायतोंडेच्या भूमिकेतील कमलेश सावंत पुन्हा एकदा दमदार काम करतात. तर सौरभ शुक्ला यांची चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांची ही भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे.

का पहावा चित्रपट?

दृश्यम आणि दृश्यम 2 हे साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचे हिंदी रिमेक आहेत. तुम्ही मल्याळम चित्रपट पाहिला असला तरी हिंदी व्हर्जन तुम्हाला निराश नक्कीच करणार नाही. फॅमिली इंटरटेन्मेंटसोबतच यामध्ये सस्पेन्स आणि थ्रिलरचा डबल डोस आहे. साळगावकरचं कुटुंब सात वर्षांनी परतलं आहे, या कुटुंबाची कथा तुमचं मनोरंजन नक्कीच करेल.