‘गांधी गोडसे’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे मागितली सुरक्षा

| Updated on: Jan 24, 2023 | 1:07 PM

राजकुमार संतोषी यांनी पोलिसांकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आणि फक्त त्यांच्याच नाही तर कुटुंबीयांच्याही जीवाला धोका असल्याचं म्हटलंय.

गांधी गोडसेचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे मागितली सुरक्षा
Gandhi Godse Ek Yudh
Image Credit source: Youtube
Follow us on

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटानंतर आता दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. हा वाद इतका वाढलाय की आता राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीनंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राजकुमार संतोषी यांनी पोलिसांकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आणि फक्त त्यांच्याच नाही तर कुटुंबीयांच्याही जीवाला धोका असल्याचं म्हटलंय.

राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ’20 जानेवारी रोजी माझ्या टीमसोबत मी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईतील अंधेरी याठिकाणी ही पत्रकार परिषद सुरू होती. त्यावेळी एक गट तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे आम्हाला पत्रकार परिषद थांबवावी लागली’, असं त्यांनी तक्रारीत म्हटलंय.

‘गांधी गोडसे- एक युद्ध’ या चित्रपटाचं प्रमोशन आणि रिलीज नाही थांबवलं तर त्याचे परिणाम चांगले नसतील, अशाही धमक्या मिळाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली. ‘मी तुम्हाला विनंती करतो की मला आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना त्वरित अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात यावी. जर अशा लोकांना मोकळं सोडलं आणि त्यांच्याविरोधात काही पावलं उचलली नाहीत, तर ते खूप मोठं नुकसान करू शकतात,’ असंही त्यांनी तक्रारीत लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटावर महात्मा गांधी यांचे पुतणे तुषार गांधी यांनीसुद्धा टीका केली आहे. ज्या चित्रपटात मारेकऱ्याचं उदात्तीकरण केलं जातं, असा चित्रपट पाहण्याची मला इच्छा नाही, असं ते म्हणाले.

हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेते दीपक अंतानी यामध्ये गांधींच्या भूमिकेत आहेत. तर मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात गोडसेची भूमिका साकारतोय.