
रिअॅलिटी शोजमधील विजेत्यांना मोठमोठी रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली जाते. परंतु शो संपल्यानंतर कित्येक दिवस उलटूनही त्यांना त्यांचे पैसे मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन संपुष्टात आला होता. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला होता. गौरवने 50 लाख रुपये जिंकले होते. शोच्या ग्रँड फिनालेमध्ये याची घोषणा करण्यात आली होती. परंतु अजूनही त्याला बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. तीन महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने अखेर गौरवने मौन सोडलं आहे.
गौरव खन्नाने त्याच्या व्लॉगमधील प्रश्नोत्तरांच्या सेशनदरम्यान याबद्दल सांगितलं आहे. एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की, बिग बॉसमध्ये जिंकलेली रक्कम आणि कार त्याला मिळाली का? त्यावर उत्तर देताना गौरव म्हणाला, “नाही, अद्याप तरी मिळालेलं नाही. खरं सांगायचं झालं तर ही रक्कम मिळायला वेळ लागतो. मला पूर्ण विश्वास आहे की मला ही रक्कम मिळेल. कारण त्यासाठी एक प्रक्रिया असतो. त्यामुळे ते पैसे मिळणारच नाही, असं होणार नाही. मी टीव्ही इंडस्ट्रीत बऱ्याच वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे पैसे मिळायला वेळ लागतो, हे मला माहीत आहे.” टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांना कुठल्याही प्रोजेक्टचे पैसे त्याच वेळी मिळत नाहीत. त्यासाठी त्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागते. सध्या गौरवसुद्धा त्याच्या बक्षिसाच्या रकमेची प्रतीक्षा करत आहे.
या सेशनदरम्यान दुसऱ्या एका चाहत्याने त्याला विचारलं की शो जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला आहे? त्यावर गौरव म्हणाला, “मी आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आणि शोजमध्ये भाग घेतला. पण बिग बॉसमुळे जी ओळख आणि प्रसिद्धी मिळते, ती त्या सर्वांपेक्षा जास्त आहे. माझ्या कानपूर इथल्या घरी मला भेटण्यासाठी जवळपास 50 ते 60 लोकं येतात.”
ऑगस्ट महिन्यात बिग बॉसचा 19 वा सिझन सुरू झाला होता. त्याची सांगता 7 डिसेंबर 2025 रोजी झाली होती. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा झाली. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. तर अंतिम चुरस गौरव आणि फरहाना यांच्यात रंगली होती. अखेरच्या दहा मिनिटांमध्ये गौरवला अधिक मतं मिळाली आणि विजेतेपदावर त्याने आपलं नाव कोरलं होतं.