गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची तुफान चर्चा; नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी

‘कृष्ण सावळा रे’ हे गाणे ऐकताना जसं मन हरखून जातं, तसंच त्याचं दृश्यरूपही डोळ्यांना आणि मनाला एक अनोखा आनंद देतं. भक्ती आणि प्रेमाच्या या सुरेल संगमाने सजलेलं हे गाणं रसिकांच्या मनात दीर्घकाळ घर करणारं आहे. हे सुंदर गाणं सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची तुफान चर्चा; नृत्यातून रंगवली राधिकेची कहाणी
Gautami Patil
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2026 | 10:23 AM

मनाला मोहणाऱ्या कृष्णाच्या सावळ्या रूपाची जादू आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या राधिकेची कोमल भावना.. या सुंदर नात्याचा सुरेल आविष्कार आता ‘कृष्ण सावळा रे’ या नव्या गाण्यातून रसिकांच्या भेटीला आला आहे. हे गाणे म्हणजे भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा सुंदर संगम असून त्यातून राधिकाच्या कृष्णाप्रती असलेल्या भावना अतिशय भावपूर्ण पद्धतीने उलगडत आहेत. राधिकेच्या नजरेतून दिसणारा कृष्णाचा मोहक, खट्याळ आणि प्रेमळ चेहरा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. यात विशेष आकर्षण ठरतं ते गौतमी पाटीलचं नृत्य.

आपल्या अदाकारीने आणि लयबद्ध हालचालींनी गौतमीने राधिकेच्या भावना इतक्या प्रभावीपणे साकारल्या आहेत की प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात. तिच्या प्रत्येक हालचालीतून प्रेम, ओढ आणि समर्पण व्यक्त होतं. या नृत्याला अधिक खुलवण्याचं काम सिनेनृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी केलं आहे. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस नेरुरकर यांच्या दिग्दर्शनाने या संकल्पनेला सुंदर दृश्यरूप दिलं आहे. अवंतिका बहिरट यांच्या अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्दांना तरुण संगीतकार आदित्य पाटेकर यांच्या सुरेल आणि लक्षवेधी संगीताची जोड लाभल्याने हे गाणं अधिकच उठून दिसतं. सोनाली सोनावणे आणि आदित्य पाटेकर यांच्या आवाजातील गोडवा या गाण्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारा आहे.

या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं भव्य आणि नजरेत भरणारं सादरीकरण. संपूर्ण गाणं महाराष्ट्रीय संस्कृतीच्या साजाने सजलेलं असून पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि रंगसंगती यामुळे एक खास बनत आहे. महाराष्ट्रीय पद्धतीने चित्रित केलेल्या या गाण्यातील प्रत्येक फ्रेममध्ये संस्कृतीची झलक दिसते, ज्यामुळे सादरीकरण अधिक उठावदार आणि भव्य वाटतं.

पहा व्हिडीओ-

या गाण्याबद्दल दिग्दर्शक तेजस नेरुरकर म्हणाला, “श्रीराधिकाजींच्या नजरेतून दिसणारे श्रीकृष्ण नेहमीच मोहक वाटतात. ते खट्याळ आहेत, प्रेमळ आहेत आणि तरीही गूढ आहेत. हीच त्यांची जादू या गाण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, ही आमची इच्छा होती. गाणं चित्रित करताना अनेक अडचणी आल्या, मात्र देवाच्या कृपेने आम्ही त्या सर्व अडचणींवर मात केली. या सगळ्यात संपूर्ण टीमने खूप मनापासून काम केलं आहे. गीत, संगीत, गायन, सादरीकरण आणि विशेषतः नृत्य प्रत्येक घटक एकत्र येऊन या गाण्याला एक वेगळं सौंदर्य देतो. मला खात्री आहे की, हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल आणि त्यांच्या भावविश्वात एक खास स्थान निर्माण करेल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us