‘बागबान’मध्ये अमिताभच खरे विलन; 20 वर्षांनंतर का होतेय टीका? अखेर ऑनस्क्रीन मुलाने घेतला मोकळा श्वास

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'बागबान' हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. मात्र आता जवळपास दोन दशकांनंतर या चित्रपटावर टीका होत आहे.

बागबानमध्ये अमिताभच खरे विलन; 20 वर्षांनंतर का होतेय टीका? अखेर ऑनस्क्रीन मुलाने घेतला मोकळा श्वास
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी, समीर सोनी
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2026 | 12:28 PM

अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागवान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. रवी चोपडा यांचा हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा कुटुंबच्या कुटुंब थिएटरकडे वळले होते. या चित्रपटात आईवडील आणि मुलांकडून त्यांना दिली जाणारी वागणूक याविषयीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पालकांनी त्यांच्या मुलांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्यांना आता मुलं ओझं समजू लागले आहेत, अशा आशयाची ही कथा होती. या चित्रपटाच्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी मुलांविषयी जे भाषण दिलं, ते ऐकून आजही अनेकांचे डोळे पाणावतात. 2003 मध्ये आणि त्यानंतर काही वर्षांपर्यंत जरी या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं असलं तरी आता जवळपास दोन दशकांनंतर त्यावर टीका होऊ लागली आहे. हीच टीका पाहून बिग बींच्या ऑनस्क्रीन मुलाला दिलासा मिळाला आहे.

दोन दशकांनंतर ‘जेन झी’ वर्ग या चित्रपटाकडे समकालीन आणि आलोचनात्मक दृष्टीकोनातून पाहू लागलं आहे. या चित्रपटात अभिनेता समीर सोनीने अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर एका इन्फ्लुएन्सरने ‘बागबान’मधल्या काही दृश्यांवर टीका करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हाच व्हिडीओ समीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही रील शेअर करताना समीरने व्यंगात्मक आणि बदलत्या काळाचं, बदलत्या विचारांचं कौतुक केलं आहे. ‘अखेर 20 वर्षांनंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. मला नवीन पिढी खूप आवडतेय’, असं त्याने लिहिलं आहे.

संबंधित रीलमध्ये इन्फ्लुएन्सरने समीर सोनीच्या व्यक्तीरेखेचं समर्थन केलंय. “बागबानमधील हा माणूस खरंतर ‘ग्रीन फ्लॅग’सारखा आहे. पण त्याला खलनायकाच्या रुपात दाखवलं गेलंय. तो त्याच्या पत्नीचं ऐकतो, वेळेवर घरी येतो, वेळेवर कामाला निघून जातो, पत्नीला डिनरसाठी घेऊन जातो, लग्नाचा वाढदिवसही त्याच्या लक्षात असतो. इतकंच नव्हे तर हा मुलगा हुशारसुद्धा आहे. कारण तो त्याच्या वडिलांना प्रश्न विचारतो की तुमची कोणती एफडी, पीपीएफ नाही का? बँकेत काम करणाऱ्या वडिलांनी सेव्हिंग का केली नाही, हे विचारणं काही चुकीचं नाही”, असं यामध्ये म्हटलं गेलं आहे.

चित्रपटाच्या दुसऱ्या एका सीनमध्ये अमिताभ बच्चन रात्रीच्या वेळी टाइपराइटरवर टाइप करत बसतात. ज्या सुनेला दुसऱ्या दिवशी लवकर उठून कामावर जायचं असतं, तिला रात्री झोपताना टाइपराइटरच्या आवाजाचा त्रास होत असेल तर याच चुकीचं काय आहे? ते हे काम दिवसासुद्धा करू शकले असते. प्रत्येक गोष्टीच मुलं किंवा सुनाच चुकीच्या नसतात, असं त्यात म्हटलं गेलं आहे. या रीलवर नेटकरीसुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.