सोन्याच्या मोहात गूढ विहिरीत उतरला संदीप पाठक; नेमकं रहस्य काय?
सोन्याच्या मोहात अभिनेता संदीप पाठक चक्क एका गूढ विहिरीत उतरला आहे. या विहिरीत नेमकं काय आहे आणि त्यामागचं रहस्य काय आहे, याची उत्तरं येत्या 19 जूनला मिळणार आहेत. त्यापूर्वी संदीप पाठकच्या 'घबाडकुंड'चा हा टीझर पहा..

चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठकचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली आहे. आता मात्र प्रेक्षकांना संदीप पाठकचा एकदम वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोन्याच्या मोहात तो चक्क एका गूढ विहिरीत उतरला आहे. पण हे सोनं नेमकं काय आहे आणि त्यामागचं रहस्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘घबाडकुंड’ या चित्रपटातून उलगडणार आहेत. संदीप पाठकच्या ‘दिल्या’ या व्यक्तिरेखेचा अचंबित करणारा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये संदीप पाठकचा आजवर न पाहिलेला भन्नाट अवतार समोर आला आहे.
ओरस गावातील ‘अल्याड-पल्याड’च्या गूढ आणि थरारक घटनांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा ‘दिल्या’ आता ‘घबाडकुंड’ युनिव्हर्समधील नव्या कथेत पुन्हा एकदा भेटणार आहे. भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी स्थायिक झालेल्या दिल्याची ही कहाणी ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या युनिव्हर्सला अधिक गूढ आणि रोमहर्षक बनवणार आहे. ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मराठीत मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला असून त्यांच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. ‘घबाडकुंड’ येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पहा टीझर-
आपल्या विहिरीत उतरण्याच्या अनुभवाबद्दल संदीप पाठक म्हणाला, “‘घबाडकुंड’मध्ये दिल्या साकारताना आव्हानं खूप होती. ‘अल्याड-पल्याड’ मागे ठेवून दिल्याला पूर्णपणे नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणायचं होतं. त्यात विहिरीत उतरण्याचा अनुभव तर खूपच वेगळा आणि अंगावर काटा आणणारा होता त्या प्रत्येक सीनमध्ये भीती, थरार आणि वास्तव यांचा तोल सांभाळणं ही खरी कसोटी होती. ‘विहिरीत उतरणं म्हणजे फक्त सोन्याचा शोध नव्हता. प्रत्येक पावलागणिक भीती, अंधार आणि अनोळखी शक्तींशी सामना होता. हा अनुभव आजही अंगावर शहारे आणतो.”