
उत्तर प्रदेशच्या राजकारणात नेटफ्लिक्सवरील ‘घुसखोर पंडत’ या वेबसीरिजने चांगलीच खळबळ उडवली आहे. मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजमुळे तिथलं वातावरण तापलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरून या सीरिजचे दिग्दर्शक आणि टीमच्या विरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता या सीरिजच्या वादात बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उडी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणात त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला आहे. पंडितांना घुसखोर म्हणण्याबद्दल त्यांची तक्रार असून या सीरिजमध्ये देशातील ब्राह्मण समुदायाचा अपमान केल्याचा आरोप त्यांना केला आहे.
मायावती यांनी याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ‘गेल्या काही काळापासून फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर चित्रपटांमध्येही पंडितांना घुसखोर म्हणत देशभरात त्यांचा अपमान आणि अनादर केला जात आहे. ही अत्यंत दु:खद आणि चिंतेची बाब आहे. यामुळे संपूर्ण ब्राह्मण समुदायात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. माझा पक्ष या सीरिजचा तीव्र निषेध करतो. केंद्र सरकारने तात्काळ यावर बंदी घालावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यह बड़े दुख व चिन्ता की बात है कि पिछले कुछ समय से अकेले यू.पी. में ही नहीं बल्कि अब तो फिल्मों में भी ’पंडत’ को घूसखोर आदि बताकर पूरे देश में जो इनका अपमान व अनादर किया जा रहा है तथा जिससे समूचे ब्राह्मण समाज में इस समय ज़बरदस्त रोष व्याप्त है, इसकी हमारी पार्टी भी कड़े शब्दों…
— Mayawati (@Mayawati) February 6, 2026
‘घुसखोर पंडत’ या वेब सीरिजच्या शीर्षकावरून सुरू असलेला हा संपूर्ण वाद आता उत्तर प्रदेशातील राजकारणालाही प्रभावित करतोय. उत्तर प्रदेशात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणनिर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांत ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा जवळपास सर्वच विरोधी पक्षांकडून उचलून धरण्यात आला होता. ब्राह्मण समुदायाच्या दुर्लक्षाचा मुद्दा समाजवादी पार्टीपासून बहुजन समाज पार्टीपर्यंत सर्वांनी उपस्थित केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ब्राह्मण समाज हा भाजपच्या बाजूने एकजूट दिसला होता. काही दिवसांपूर्वीच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ब्राह्मण आमदारांची एक बैठकसुद्धा झाली. यावरून भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने प्रश्न उपस्थित केला होता. प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी हे ब्राह्मण आमदारांना इशारा देताना दिसले. त्यानंतरच मायावती यांनी या मुद्द्यावर एक निवेदन जारी करून अशा बैठकांचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला.
2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी ब्राह्मण समाजाच्या मतपेढीला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मागासवर्गीय, दलित आणि मुस्लीम मतपेढींसह ब्राह्मणांनाही एकत्र करून राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर आता मायावती पुन्हा एकदा ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.