मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते गिरीश ओक हे तब्बल 30 वर्षांनंतर अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'कुसुम मनोहर लेले' आणि 'जुळून येती रेशीमगाठी' नंतर या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो..; गिरीश ओक असं का म्हणाले?
Girish Oak
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2026 | 9:00 AM

मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, चोखंदळ प्रेक्षकांसाठी एक कमालीची सुखद आणि भावनिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यवर्तुळात ज्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू होती, अखेर त्या नाटकाच्या नावाची आणि भक्कम स्टारकास्टची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवरील दोन महामेरू म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिग्गज अभिनेते डॉ. गिरीश ओक तब्बल 30 वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत असून, या बहुप्रतिक्षित नाटकाचं नाव आहे ‘आता थांबवायचं कसं?’

“मुलीचा बाप म्हणून ती कथा पाहून मी आतून हादरलो!” – डॉ. गिरीश ओक

30 वर्षांनंतर सुकन्या मोने यांच्याशी पुन्हा जुळलेल्या समीकरणाबद्दल डॉ. गिरीश ओक भावूक होत सांगतात की, “सुकन्यासोबत 30 वर्षांनंतर नाटकात काम करताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच प्रवासात तिचं आणि संजयचं लग्न आमच्या डोळ्यांदेखत झालं होतं. आज एका नव्या केमिस्ट्रीसह आम्ही एकत्र आलो आहोत. मी पनवेलच्या एका स्पर्धेत ही कथा एकांकिका स्वरूपात पाहिली होती आणि एक मुलीचा बाप म्हणून मी आतून पार हादरलो होतो. हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर येणं काळाची गरज आहे, असं वाटल्याने मी याचा पाठपुरावा केला.”

“आजच्या काळात ‘निर्जीव फोन स्मार्ट होत चालला आहे आणि जिवंत माणूस बावळट’, हे भीषण वास्तव आहे. सोशल मीडियाचा निष्काळजी वापर आणि तरुण पिढीची बेफिकीरी यामुळे संपूर्ण कुटुंबावर कसं वादळ येऊ शकतं, यावर हे नाटक बोट ठेवतं. एक अभिनेता म्हणून यातला ‘बाप’ साकारताना मला वैयक्तिक आयुष्यातही त्याची तीव्रता जाणवतेय. हे नाटक पालकांना आणि पाल्यांना एकत्र आणून एक निश्चित दिशा देईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“10 वर्षांनंतर रंगभूमीवर येणं ही माझी स्वतःची परीक्षा!” – सुकन्या कुलकर्णी-मोने

तब्बल 10 वर्षांनंतर रंगभूमीवर पाऊल ठेवणाऱ्या सुकन्या मोने या भूमिकेबद्दल सांगतात की, “2014 मधील ‘सेल्फी’नंतर मी नाटक केलं नव्हतं. पण ‘आता थांबवायचं कसं?’ ची संहिता माझ्या मनाला स्पर्श करून गेली. ‘कुसुम मनोहर लेले’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ नंतर गिरीशबरोबर पुन्हा काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच आहे. आमचं ‘गिव्ह अँड टेक’ इतकं सहज आहे की आम्हाला संवादांचीही गरज पडत नाही.

“यात मी साकारत असलेली मध्यमवर्गीय आई अत्यंत आव्हानात्मक आहे. परिस्थितीविरुद्ध बंड पुकारायचं असूनही कौटुंबिक संस्कारांमुळे तिचे हात बांधले गेले आहेत, तिची ही अगतिकता आणि मनातील वादळ साकारताना माझी स्वतःचीच एक परीक्षा चालली आहे. हे नाटक पालकांना आणि आजच्या ‘टेक्नोसॅवी’ तरुण पिढीला अंतर्मुख करणारं, त्यांचे डोळे उघडणारं आहे. संकटसमयी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहाचं, हे सांगणारी ही आजची जिवंत गोष्ट आहे”, असं त्या पुढे म्हणाल्या.

5 दिग्गज निर्मात्यांची खंबीर साथ

केवळ पडद्यावरचे कलाकारच नाही, तर या नाटकाची निर्मिती बाजूही मराठी रंगभूमीवरील सर्वात भक्कम बाजू मानली जात आहे. रंगभूमीला ‘बोलविता धनी’ सारखी अत्यंत यशस्वी कलाकृती देणाऱ्या प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर या 5 ताकदीच्या आणि दिलदार निर्मात्यांनी या नाटकासाठी एकत्र हातमिळवणी केली आहे.

आजच्या काळातील एका गंभीर प्रश्नावर खंबीर भाष्य!

नाटकाची मूळ कथा गुप्त ठेवली असली तरी, या नाटकाचा गाभा आजच्या काळातील प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावणारा आहे. एका हसत्या-खेळत्या मध्यमवर्गीय कुटुंबावर जेव्हा अचानक एखादं वादळ घोंगावू लागतं, तेव्हा होणारी पालकांची घालमेल यात दिसेल. आजच्या तंत्रज्ञानाच्या भडिमारामुळे तरुण पिढी आणि पालकांसमोर उभे ठाकलेले गंभीर प्रश्न, आणि अशा प्रसंगात ‘छाती काढून रडायचं की मूठ आवळून लढायचं’ हा पालकांचा संघर्ष यात अतिशय भावनिक पद्धतीने मांडण्यात आला आहे. रक्ताचं पाणी करून वाढवलेल्या लेकरांना वाचवण्यासाठी पालकांनी दिलेला हा लढा पालकांसाठी आणि आजच्या पिढीसाठी एक जिवंत उदाहरण ठरेल.

तगडी स्टारकास्ट आणि कसलेले तंत्रज्ञ

या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत जान्हवी पणशीकर, आकाश पाटील आणि ऐश्वर्या शेटे यांच्या प्रमुख भूमिका असून, अभिनयाची एक मोठी जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण नाटकाचं सशक्त लेखन आणि दिग्दर्शन संदिप दंडवते यांनी केलं आहे. नाटकाच्या देखण्या नेपथ्याची धुरा संदेश बेंद्रे, प्रकाश योजना रत्नाकांत जगताप,संगीत समीर म्हात्रे, वेशभूषा अमृता काकतकर, रंगभूषा राजेश परब यांनी समर्थपणे सांभाळली असून दीपक गोडबोले हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.

शुभारांभाचे भव्य प्रयोग:

• 30 मे 2026 (शनिवार): दुपारी 4 वाजता — गडकरी रंगायतन, ठाणे.
• 31 मे 2026 (रविवार): दुपारी 4 वाजता — रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.

30 वर्षांनंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक या दोन महामेरूंना पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Follow Us