अशा काळात बॉलिवूड साथ देत नाही..; राजपाल यादव प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते स्पष्टच म्हणाले

अभिनेता राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणात आता एका ज्येष्ठ अभिनेत्याने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अशा कठीण काळात बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोक साथ देत नाही, असं ते म्हणाले. बॉलिवूड इंडस्ट्रीचं वास्तव त्यांनी सांगितलं.

अशा काळात बॉलिवूड साथ देत नाही..; राजपाल यादव प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते स्पष्टच म्हणाले
Govind Namdev and Rajpal Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 12:32 PM

चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी राजपालने जे चेक दिले होते, ते बाऊन्स झाल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली आहे. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा राजपाल सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करत आहे. या कठीण काळात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्याची मदत करत आहेत. सलमान खान, सोनू सूद, मिका सिंह यांसारख्या सेलिब्रिटींनी त्याला आर्थिक मदत जाहीर केली आहे. आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे अभिनेते गोविंद नामदेव यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव म्हणाले, “मी पाहिलंय, जेव्हा बॉलिवूडमध्ये अशाप्रकारची घटना होते, तेव्हा लोक साथ देत नाहीत. असंच होत आलंय आणि पुढेही होत राहील. त्यामागे विचार असतो, संस्कार असतात. ज्यांच्यात मदत करण्याचे संस्कार नसतात, ते कधीच करत नाहीत. इथली हवा त्यांना असं बनवते. खूपच दुर्दैवी आहे हे. राजपालसोबत जे काही झालं, त्याचा मी साक्षीदार आहे. तो अनायसे वाईट काळात अडकला. व्यक्ती म्हणून तो खूप चांगला आहे. यापुढचं त्याचं आयुष्य आणखी चांगलं होईल अशी मी आशा करतो. राजपालसारख्या चांगल्या माणसाला अशा संकटात पाहून मला खूप वाईट वाटतं. अनावधानाने तो या परिस्थितीत अडकला आहे. तो अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आहे.”

राजपाल यादवच्या जामीन अर्जावर गुरुवारी कोर्टात सुनावणी झाली. परंतु कोर्टाकडून त्याला दिलासा मिळाला नाही. या वादाबाबत राजपालची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगताना दिसतोय. “मी पैसे घेतले नव्हते, कारण त्यांनी फायनान्सर म्हणून स्वत: पैसे गुंतवले होते. त्यांना त्यांच्या नातवाला हिरो बनवायचं होतं. मी ‘अता पता लापता’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नव्हतो, ना आहे, ना पुढे राहणार. मी अभिनेता आहे. कधी-कधी 100 मॅच खेळायचे असतात, तर क्रिकेटर 95 मॅच खेळतो आणि 5 मॅच कधी कधी फुटबॉल खेळतो. त्यामुळे आमच्यासाठी हा क्रिएटिव्ह प्रयोग होता,” असं राजपाल म्हणाला होता.