नातवाला हिरो बनवण्यासाठी त्यांनी..; आरोपांवर राजपाल यादवचा व्हिडीओ व्हायरल
आपल्या कॉमेडीने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतोय. चेक बाऊन्सप्रकरणी त्याने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे.

अभिनेता राजपाल यादव सध्या चेक बाऊन्स प्रकरणी तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावरील कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशातच राजपालचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चेक बाऊन्स प्रकरणाबद्दल मोकळेपणे बोलताना दिसतोय. तसंच व्हिडीओमध्ये त्याने चित्रपट बनवण्यासाठी पैसे घेतल्याच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला आहे. त्याचसोबत त्याच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचंही त्याने म्हटलंय.
‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवला विचारलं गेलं की, त्याने चित्रपट बनवण्यासाठी बिझनेसमन माधव गोपाल अग्रवालकडून पाच कोटी रुपये घेतले होते का? त्यावर उत्तर देताना राजपाल म्हणाला, “मी पैसे घेतले नव्हते, कारण त्यांनी फायनान्सर म्हणून स्वत: पैसे गुंतवले होते. त्यांना त्यांच्या नातवाला हिरो बनवायचं होतं. मी ‘अता पता लापता’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नव्हतो, ना आहे, ना पुढे राहणार. मी अभिनेता आहे. कधी-कधी 100 मॅच खेळायचे असतात, तर क्रिकेटर 95 मॅच खेळतो आणि 5 मॅच कधी कधी फुटबॉल खेळतो. त्यामुळे आमच्यासाठी हा क्रिएटिव्ह प्रयोग होता.”
“गेल्या 10 वर्षांमध्ये मला काय काय नुकसान सहन करावं लागलं आहे. परंतु तुम्ही खूप काही हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु ज्या हास्याला देवाने बनवलंय, ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोणी माझी बदनामी करत असेल किंवा माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने मी विचलित झालो नाही. मी उलट कोर्टाचे आभार मानतो, कारण कोर्ट नसतं तर समोरच्या व्यक्तीने थेट मला फाशीच दिली असती. कोर्टाने मला वाचवलं आहे. कारण कोर्टात कोणतीच व्यक्ती अभिनय करू शकत नाही. कधी कधी असं होतं की एखाद्याकडे पुरावे म्हणून 50 पानं असतात आणि दुसऱ्याकडे फक्त ‘जंग’ या चित्रपटातील एक डायलॉग असतो की, जजसाहेब.. ज्यांच्याकडे पुरावे नसतात, ते निर्दोष नसतात का”, अशा शब्दांत राजपाल व्यक्त झाला.
याविषयी तो पुढे म्हणाला, “या सर्वांना मी इतकंच सांगू इच्छितो की जी प्रतिमा आहे ती खूप वेगळी आहे. मी पुन्हा कोर्टाचे आभार मानतो की त्यांनी माझ्या म्हणण्याला महत्त्व दिलं.”
