7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक
या अभिनेत्याला फिटेस्ट हिरो म्हणून ओळखलं जातं. त्याची यशोगाथा ही केवळ एका अभिनेत्याची नाही, तर जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी आहे. एकेकाळी वेटर म्हणून काम केलेल्या त्याने गरिबीतून संघर्ष करत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. 14 फ्लॉप चित्रपटानंतरही हार न मानता त्याने स्वतःला सिद्ध केले. त्याची ही कहाणी अनेकांसाठी कठीण परिस्थितीतही स्वप्ने कशी पूर्ण करावीत, याचे उत्तम उदाहरण आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एका आहे, पण तो सर्वात फिट अभिनेता म्हणूही ओळखला जातो. ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय वर्षाला अनेक चित्रपटांमध्ये काम करतो. कोट्यवधींची कमाई, आलिशान जीवनशैली आणि अफाट लोकप्रियता हे त्याच्या आजच्या आयुष्याचे भाग आहेत. पण या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष, अपयश आणि कठोर मेहनत दडलेली आहे. आज ज्याला संपूर्ण देश ओळखतो, पण त्या अक्षय कुमारने कधी काळी गरिबीचे दिवस पाहिले होते. संघर्षाच्या काळात त्याने अनेक छोटी-मोठी कामं केली. अगदी वेटरपासून ते पासपोर्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यापर्यंतचा प्रवास करत त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला.
अक्षयनेच एका मुलाखतीत त्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटले होते की, “जेव्हा मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, तेव्हा माझ्या खिशात 200 रुपयेही नव्हते. आज माझ्याकडे खूप काही आहे.” हे वाक्य त्याच्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी सांगण्यासाठी पुरेसे आहे.
बँकॉकमध्ये वेटर म्हणून काम
अक्षय कुमार याचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. शालेय जीवनात तो सातवीत नापास झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याच काळात त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला. कुटुंबाच्या परिस्थितीमुळे अक्षयला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अक्षयने प्रचंड मेहनत घेतली. त्याने बँकॉकमध्ये वेटर म्हणून काम केले. एवढंच नव्हे तर त्याने पासपोर्ट ऑफिसमध्ये नोकरी केली, बांगड्या विकल्या आणि एका फॅशन फोटोग्राफरला मदत करत मॉडेलिंगच्या जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतरही अक्षयचा संघर्ष संपला नाही. त्याच्या करिअरमध्ये सलग 14 चित्रपट फ्लॉप झाले, पण अक्षयने हार मानली नाही. आज अक्षय कुमारची संपत्ती हजारो कोटींमध्ये आहे आणि तो इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
24 जण एका खोलीत आणि 100 रुपये भाड्याचे घर
अक्षय कुमार याने ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या बालपणातील आठवणी शेअर केल्या होत्या. तो म्हणाला होता, दिल्लीतील चांदणी चौकातून मुंबईत आल्यानंतर त्याचं कुटुंब सायन कोळीवाडा परिसरात एका छोट्याशा घरात राहत होतं. “आम्ही चांदणी चौकात एका घरात 24 जण राहत होतो. सगळे एकाच खोलीत झोपायचो. सकाळी व्यायामासाठी उठल्यावर बाहेर जाण्यासाठी एकमेकांच्या वरून उडी मारावी लागायची.” अशी आठवण त्याने शेअर केली.
त्या काळात त्याच्याकडे पैसा कमी होता, पण आनंदाची कमतरता नव्हती. अक्षय पुढे म्हणाला, “देवाची शपथ, असा एकही दिवस नव्हता जेव्हा आम्ही हसलो नाही. आज पैसा आहे, पण कधी-कधी दुःखही येतं. त्या काळात मात्र आमच्याकडे खूप कमी गोष्टी होत्या , तरी आम्ही आनंदी होतो. आम्ही डाळ-भात, जिरे आलू, आलू-गोभी, भेंडी असे साधे पदार्थ खायचो आणि खुश राहायचो.” असे किस्से त्याने सांगितलं.