‘चोली के पीछे क्या है’चा रिमेक ऐकून भडकल्या ईला अरुण; म्हणाल्या “हे गाणं ऐकून”

| Updated on: Mar 29, 2024 | 8:58 AM

'खलनायक' या चित्रपटातील मूळ गाणं अभिनेत्री माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी या गाण्यावरून वादसुद्धा झाला होता. 'चोली के पीछे क्या है' या शब्दांवरून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र हे गाणं बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलं होतं.

चोली के पीछे क्या हैचा रिमेक ऐकून भडकल्या ईला अरुण; म्हणाल्या हे गाणं ऐकून
Ila Arun and Kareena Kapoor
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री करीना कपूर, क्रिती सनॉन आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘क्रू’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट आज (29 मार्च) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘क्रू’च्या ट्रेलरला दमदार प्रतिसाद मिळाला असून त्याची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली आहे. मात्र या चित्रपटातील एका गाण्यावरून अद्याप वाद सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘चोली के पीछे’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील मूळ गाण्याचं हे रिमेक आहे. मूळ गाणं प्रसिद्ध गायिका ईला अरुण यांच्या आवाजात गायलं गेलं होतं. बॉलिवूडमधील हे सर्वांत हिट गाणं ठरलं होतं आणि आजही ते तितकंच लोकप्रिय आहे. मात्र ‘क्रू’मधील या गाण्याचा रिमेक ऐकून ईला अरुण यांचा पारा चढला आहे.

‘क्रू’मधील ‘चोली के पीछे क्या है’ हे रिमेक गाणं लाँच करण्याच्या पाच मिनिट आधी त्यांना त्याविषयी सांगण्यात आलं होतं. यामुळे आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याचं त्या म्हणाल्या. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला याची कल्पनाच नव्हती की ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याचा रिमेक बनवला गेलाय. अशात मी त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय अजून काय करू शकते? मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत नकार देऊ शकत नव्हती. मी चकीत झाले होते पण मी त्यांना हे विचारू शकले नाही की त्यांनी असं का केलं? मला या गाण्यावर कोणताच वाद उपस्थित करायचा नाही. मात्र मी त्यांना मी हे विचारू शकले नाही की त्यांनी असं का केलं? त्यामुळे या नव्या गाण्यावर माझी प्रतिक्रियाही तशीच आहे, जशी अल्का याज्ञिक यांची होती.”

हे सुद्धा वाचा

“खलनायक चित्रपटातील हे गाणं आयकॉनिक होतं. कंपन्यांना वाटतं की जुनी गाणी रिक्रिएट केल्याने ती नव्या आणि तरुण लोकांपर्यंत अधिक पोहोचतात. पण अशी करायची गरजच काय आहे? तरुण दिग्दर्शकांनी स्वत:ची नवीन गाणी आणली पाहिजेत. जुन्या आणि चांगल्या गाण्यांना का खराब करताय? जर तुम्हाला गाणं रिक्रिएट करायचंच असेल तर मग मूळ कलाकाराला त्यात संधी दिली पाहिजे आणि त्यांना नफ्याचा काही भागसुद्धा द्यायला हवा”, अशीही मागणी त्यांनी केली.