जुही चावलाने सहा वर्षांपर्यंत लपवलं लग्न; पतीमुळे केला टीकेचा सामना

| Updated on: Nov 13, 2022 | 6:13 PM

जुही चावलाच्या लग्नाची गोष्ट; 6 वर्षांपर्यंत जपलं लग्नाचं सीक्रेट

जुही चावलाने सहा वर्षांपर्यंत लपवलं लग्न; पतीमुळे केला टीकेचा सामना
जय मेहता, जुही चावला
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई- 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्री जुही चावलाने आपल्या सौंदर्याच्या आणि दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये जुहीचं नाव घेतलं जायचं. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामुळे जुहीला प्रसिद्धी मिळाली. आजही तिची लोकप्रियता कायम आहे. जुहीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र एकेकाळी तिला तिच्या लग्नामुळे लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. जुहीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊयात..

जुहीने डर, दिवाना मस्ताना, इश्क, हम है राही प्यार के यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. त्यावेळी प्रत्येक निर्मात-दिग्दर्शकाला त्यांच्या चित्रपटांमध्ये नायिका म्हणून जुहीच हवी होती. मात्र चित्रपटांशिवाय जुही तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली होती.

जुहीने तिच्यापेक्षा वयाने पाच वर्षे मोठे असलेल्या व्यावसायिकाशी गुपचूप लग्न केलं होतं. जय मेहता असं त्यांचं नाव होतं. जुहीच्या लग्नाच्या वृत्ताने त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. लग्नाआधी जय आणि जुही यांच्या अफेअरबद्दल कोणालाच माहीत नव्हतं.

हे सुद्धा वाचा

लोकांनी जुही आणि जय यांच्या नात्याची खिल्ली उडवली होती. अनेकांनी तिरस्कारही व्यक्त केला होता. काहीजण जुहीच्या पतीला म्हातारा म्हणाले, तर जुहीने पैशांसाठी लग्न केलं असंही काहीजण म्हणाले.

कोण आहेत जय मेहता?

जय मेहता हे मल्टिनॅशनल कंपनी मेहता ग्रुपचे मालक आहेत. त्यांच्या सिमेंटच्याही दोन कंपन्या आहेत. शाहरुख खानसोबत ते आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचे सहमालक आहेत.

जुही चावली ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जय यांची पत्नी पत्नी सुजाता बिडला यांचं 1990 मध्ये बेंगळुरूमध्ये एका विमान अपघातात निधन झालं होतं. त्याचवेळी जुहीनेही तिच्या आईला गमावलं होतं. या घटनांदरम्यान जय आणि जुही यांच्यातील जवळीक वाढली.

कठीण काळात दोघांनीही एकमेकांना साथ दिली. अखेर 1995 मध्ये दोघांनी गपचूप लग्न केलं. या दोघांना जान्हवी ही मुलगी आणि अर्जुन मुलगा आहे.

लग्नाचं सीक्रेट

एका मुलाखतीत जुहीने लग्न सीक्रेट का ठेवलं, याबद्दल सांगितलं होतं. “लग्नाचा टॅग मिळाल्यानंतर अभिनेत्रीच्या करिअरला मोठा ब्रेक लागतो. त्यावेळी इंटरनेट किंवा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे लग्नाबद्दल फार कोणाला कळू दिलं नव्हतं. करिअरला ब्रेक लागू नये या भीतीने लग्न केल्याचं सर्वांपासून लपवलं”, असं ती म्हणाली होती.