रणवीरने ‘कांतारा’ची नक्कल करत चिडवलेलं, आता ऋषभ शेट्टीने ‘धुरंधर 2’साठी जे लिहिलं, ते वाचून तुम्हीही म्हणाला वाह!

अभिनेता रणवीर सिंहने एका कार्यक्रमात मंचावर ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'मधील चावुंडी देवीची नक्कल केली होती. यामुळे ऋषभ खूप नाराज झाला होता. त्यानंतर आता रणवीरच्या 'धुरंधर 2'विषयी त्याने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

रणवीरने कांताराची नक्कल करत चिडवलेलं, आता ऋषभ शेट्टीने धुरंधर 2साठी जे लिहिलं, ते वाचून तुम्हीही म्हणाला वाह!
Rishab Shetty and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 12:45 PM

गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ‘इफ्फी’च्या मंचावर रणवीरने चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाली होती. त्यानंतर ऋषभनेही देवीचा अपमान केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. रणवीरने जरी ‘कांतारा’मधल्या भूमिकेवरून मस्करी केली असली तरी आता ऋषभने मात्र त्याच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. रणवीरबद्दलचा सगळा राग विसरून ऋषभने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘धुरंधर 2’च्या संपूर्ण टीमसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

ऋषभ शेट्टीची पोस्ट-

‘धुरंधर: द रिव्हेंज’चा पहिला सीन तुम्हाला अशा पद्धतीने कथेत खेचतो की तुम्ही त्यातून बाहेर पडूच शकत नाही. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही जणू युद्धाच्या नगाऱ्यासारखी वाटते. हा फक्त सीक्वेल नाही, तर हे एक विधान आहे. अप्रतिम कथाकथन, आदित्य भावा.. खरंच त्यातील बारकावे खूप आवडले. आर. माधवन सर, अर्जुन रामपाल, रणवीर सिंह, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि संजय सर सर.. प्रत्येक कलाकाराने सर्वोत्कृष्ट परफॉर्म केलं आहे, मान झुकवून मी त्यांचा सन्मान करतो. विकाश नवलखा यांनी नेत्रदीपक दृश्ये टिपली आहेत आणि संगीताच्या माध्यमातून चित्रपटाला इतक्या प्रभावीपणे एका वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या तंत्रज्ञांचं विशेष कौतुक,’ अशा शब्दांत ऋषभने संपूर्ण टीमची पाठ थोपटली आहे.

ऋषभच्या या पोस्टवर आदित्य धरनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुझ्याकडून हे शब्द ऐकणं म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे भावा. कांताराचा मी खूप मोठा चाहता असून तुझे शब्द माझ्यासाठी आणखी खास ठरले आहेत. मी कृतज्ञ आहे’, असं आदित्यने लिहिलंय.

रणवीरने मागितली होती ऋषभची माफी

‘कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली होती.

Follow Us