Kantara: सगळं ओके, पण ‘कांतारा’ची लव्ह स्टोरी खटकली? ऋषभ शेट्टीचं उत्तर एकदा वाचाच!

'कांतारा'च्या लव्ह स्टोरीवर टीका करणाऱ्यांना ऋषभ-सप्तमीचं उत्तर

Kantara: सगळं ओके, पण कांताराची लव्ह स्टोरी खटकली? ऋषभ शेट्टीचं उत्तर एकदा वाचाच!
Kantara
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Nov 07, 2022 | 4:23 PM

मुंबई- ‘कांतारा’ हा मूळ कन्नड चित्रपट सध्या देशभरात गाजतोय. मात्र सुरुवातीला कन्नड वगळता इतर भाषांमध्ये डब करण्याचा दिग्दर्शकाचा मानस अजिबात नव्हता. प्रेक्षकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहिल्यानंतर चित्रपटाच्या टीमकडून इतर भाषांमध्ये डबिंगचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 350 पेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून ‘कांतारा’चं तोंडभरून कौतुक होत असतानाच काही जण त्यात दाखवलेल्या लव्ह-स्टोरीवर टीका करत आहेत. यावर आता खुद्द अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि अभिनेत्री सप्तमी गौडाने उत्तर दिलं आहे.

लीलासारखी (सप्तमीने साकारलेली भूमिका) सुशिक्षित आणि स्वतंत्र विचारांची मुलगी शिवासारख्या (ऋषभने साकारलेली भूमिका) उनाड मुलावर प्रेम करणार नाही, असं मत अनेकांनी नोंदवलं. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यावर बोलताना सप्तमी म्हणाली, “मी स्वत: समाजात अशा प्रेमकथा पाहिल्या आहेत.

तुम्ही काय काम करता आणि कोण आहात याचा विचार प्रेमात केला जात नाही. चित्रपटात दाखवलेली लीला आणि शिवा हे दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, एकाच गावात ते दोघं राहिले आहेत, त्यामुळे तेव्हापासून त्यांच्याच ते नातं निर्माण झालंय. ती सुशिक्षित झाल्यानंतर त्यांच्यातील ते नातं बदललं नाही. प्रेम असंच असतं. ते कोणाशीही सहज होऊन जातं.”

चित्रपटातील शिवाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही अनेकांना खटकली. त्यावर ऋषभ म्हणाला, “90 च्या दशकातील आणि खेडेगावात घडणारी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हे सर्व मी माझ्या गावात घडताना पाहिलंय आणि मला तशीच खेडेगावातील प्रेमकहाणी हवी होती. ज्या वातावरणात शिवा लहानाचा मोठा झाला, त्याला प्रेम व्यक्त करण्याची तशीच पद्धत माहीत होती.”

शिवाच्या भूमिकेचा बचाव करताना सप्तमीनेही तिचं मत मांडलं. “शिवा इतर कुठल्याही मुलीसोबत तसा वागत नाही. तो फक्त तिच्यासोबत तसा वागतो. त्याच्या प्रेमाची भाषा तशीच होती. बैलांच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या व्यक्तीला एखाद्या मुलीशी कसं बोलायचं, हे कसं कळेल. तेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे”, असं ती म्हणाली.