
‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरील शो पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक महिन्यांच्या ब्रेकनंतर हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. पण या वेळी शोचे सूत्रसंचालन निलेश साबळे करणार नसून अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. ते पाहून राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेवर पोस्ट लिहित टीका केली होती. आता अभिनेता किरण माने या पोस्ट शेअर करत निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे.
काय आहे किरण मानेची पोस्ट?
किरण मानेने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने निलेश साबळेला पाठिंबा दिला आहे. ‘निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???’ असे तो म्हणाला.
वाचा: मयूरी देशमुखने रोमँटिक सीन शूट करताना अभिनेत्याच्या लगावली कानशिलात, नेमकं काय झालं?
पुढे तो म्हणाला की, ‘तुकोबाराया सांगून गेले आहेत, सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।। त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।। कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक… आणि म्हण, ए चल्… हवा येऊ दे.’
काय आहे प्रकरण?
राशीचक्रकार शरद उपाध्ये हे काही वर्षांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये गेले होते. पण तेव्हाचा त्यांचा अनुभव अतिशय वाईट होता. त्यांनी आता फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत निलेश साबळेला खडसावले होते. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. ती पोस्ट पाहून किरण मानेने निलेश साबळेला पाठिंबा दिला.